ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

अक्षय्य तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी रायगड प्रशासन सज्ज!
नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई


रायगड-अलिबाग, दि. १७ (प्रतिनिधी) :- जिल्ह्यामध्ये बालविवाहाची अनिष्ट प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. आगामी १९ एप्रिल २०२६ रोजी असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे आयोजित केले जातात. या काळात ग्रामीण आणि आदिवासी भागांत बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी  किशन जावळे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि बाल कल्याण समितीसह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. 

यावेळी उपायुक्त (बाल विकास) यांनी या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, अक्षय्य तृतीया किंवा आखातीजच्या काळात जिल्ह्यात एकही बालविवाह होता कामा नये. यासाठी धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, समुद्रकिनाऱ्यांवरील हॉटेल्स आणि पर्यटनस्थळांवर विशेष पाळत ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार, मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे. या वयापेक्षा कमी वयात विवाह लावून देणे हा गंभीर गुन्हा आहे. जर अशा स्वरूपाचा विवाह लावला गेला, तर केवळ वर-वधूचे आई-वडीलच नव्हे, तर विवाह लावणारे भटजी, मौलवी, पादरी, मंडप व्यावसायिक, वाजंत्री आणि अगदी लग्नाला उपस्थित राहणारे वऱ्हाडी सुद्धा शिक्षेस पात्र ठरू शकतात. या गुन्ह्यासाठी १ लाख रुपये दंड आणि २ वर्षे सक्तमजुरीची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांना 'बालविवाह प्रतिबंधक अधिकारी' म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना अंगणवाडी सेविका आणि पोलीस पाटील यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गावागावात होणाऱ्या लग्नांच्या वयाची शहानिशा करण्याची जबाबदारी सरपंच, ग्रामसेवक आणि मुख्याध्यापकांवर सोपवण्यात आली आहे.

रायगड जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी आणि यंत्रणांनी प्रशासनाला सहकार्य करावे, गावात किंवा परिसरात असा कोणताही प्रकार घडत असल्यास त्वरित प्रशासनाला माहिती द्यावी, जेणेकरून बालकांचे भवितव्य सुरक्षित राहील आणि कोणतीही अघटित घटना घडणार नाही, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. जावळे यांनी केले आहे. 

Comments

Popular posts from this blog