जनरेटर भागवणार तळा शहराची तहान?

तळा (संजय रिकामे) : तळा शहराला पाणी पुरवठा करत असताना सातत्याने विजेचा पुरवठा खंडीत होत असल्याने किंवा विद्युत पुरवठा कमी दाबाने येत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अडचण येत होती. अनेकदा विजेच्या लपंडावाने पंप जळण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे तीन ते चार दिवस शहरातील पाणी पुरवठा खंडीत राहतो. यावर उपाय म्हणुन जनरेटर खरेदी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्या अनुषंगाने तळा नगरपंचायतीने तब्बल छत्तीस लाखांचे तीन जनरेटर चौदा वित्त आयोगातुन खरेदी केले आहेत. हे तीनही जनरेटर पाणी पुरवठा करणारया अंबेळी पंप हाऊस, धरण पंप हाऊस व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरील पाण्याची टाकी येथे बसविण्यात आले आहेत.आज पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते फीत कापुन हे जनरेटर तळेवासियांसाठी खुले करण्यात आले आहेत. यावेळी आ.अनिकेत तटकरे,  सभापती अक्षरा कदम, उपसभापती गणेश वाघमारे, राजिप महीला बाल कल्याण सभापती गीता जाधव, राजिप सदस्य बबन चाचले, माजी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, माजी उपनगराध्यक्षा सायली खातु, नगरसेविका नेहा पांढरकामे नगरसेवक अॅड. चेतन चव्हाण, नगरसेवक चंद्रकांत रोडे, अॅड. उत्तम जाधव, मुख्ययधिकारी माधुुुरी मडके, गटविकास अधिकारी व्ही. व्ही.यादव आदि मान्यवर उपस्थित होते. 

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ऑटो स्टार्ट प्रमाणे हे जनरेटर १५ सेकंदामध्ये चालू होणार आहेत असे बोलले जात आहे त्यामुळे तळा शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यास मदत होणार असून दररोज किमान अर्धा तास नियमित पाणी पुरवठा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. तळा शहर गेल्या अनेक वर्षांपासून पाणी समस्येने ग्रासले आहे, तळा शहराला पाणीटंचाईची समस्या नवीन नाही. पाणीपुरवठा योजना अंतर्गत  कोटी रुपये खर्च करून जलवाहिन्या उभारण्यात आल्या. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शहराची पाणीपुरवठा यंत्रणा आता जुनी झाली आहे. वाढत्या लोकसंख्येचा ताण ती पेलू शकत नाही. त्यामुळे  पुरेसे पाणी असूनही गरजे एवढा उपसा नगरपंचायत करू शकत नाही. विद्युुुत पुरवठ्यामुुळे पाणी कमी आहे,' असे  सांगितले जाते, परंंतु विद्युत पुरवठा कायमचा सुरळीत सुरु करण्यासाठी ठोस उपाय योजना केली जात नाही. तीन ते चार दिवसांआड पाणी पुरविण्याचे कसब नगरपंचायत पाणीपुरवठा यंत्रणेने गेल्या काही वर्षांत आत्मसात केले आहेत. वावे धरणातुुुन पाणी पुरवठा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. काही दिवसात मुबलक पाणी मिळणार, असे दिवा स्वप्न दाखविण्यात आले. शहरात बॅनरबाजी झाली श्रेयवाद रंगला पण पुढे काय शहराच्या नशिबी पाणी टंचाईचे चटके आलेच. जनरेटर खरेदी करुन पाणी  टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न नगरपंचायत प्रशासनाने केला आहे परंतु ही मलमपट्टी किती दिवस चालणार कायमस्वरुपी पाणी टंचाईतुन तळेवासी कधी मुक्त होणार हा प्रश्न अजुनही निरुत्तर आहे?

Popular posts from this blog