दापोलीतील कांगवई गावात कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण!

रत्नागिरी (प्रतिनिधी) : देशभरात सध्या कोरोनाच थैमान सुरु असताना, आता बर्ड फ्लूने देखील डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. देशातील अनेक राज्यात बर्ड फ्लूची पुष्टी झालेली असली, तरी महाराष्ट्रात अद्याप बर्ड फ्लूचा कोणताही प्रकार आढळलेला नव्हता. मात्र, दापोली तालुक्यातील कांगवई गावात गेल्या काही दिवसांपासून कावळ्यांचा अचानकपणे संशयास्पद मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. 

त्यामुळे या परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शासनाने या गंभीर समस्येची योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी येथील नागरिक पांडूरंग महाडीक, दिलीप ठसाळ व विजय काते यांनी केली आहे. 

परभणीमध्ये 900 कोंबड्यांचा मृत्यू 

परभणीच्या मुरुंबा गावात एका दिवसांत तब्बल 900 कोंबड्या अचानक मृत्यूमुखी पडल्या आहेत. कोंबड्या अचानक मेल्यामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या गावात कोंबड्यांची खरेदी-विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला गेलाय.

अहवालाची प्रतिक्षा

दरम्यान गावातील मृत कोंबड्यांचे सँम्पल्स पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहे. तसेच, अहवाल आल्यावरच पुढील खुलासा होईल आणि नेमके कारण समोर येईल, असे जिल्हा पशु वैद्यकिय डॉ.अशोक लोणे यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हटले आहे.

पोल्ट्री व्यवसाय ठप्प

परभणी जिल्ह्यातील मुरंबा गावात कोंबड्याच्या मृत्यूमुळे या परिसरातील कोंबड्या विकण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोंबड्याचा मृत्यू होण्याच्या घटना आताही सुरू आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले शेकडो लोक अडचणीत आले आहेत. आधीच कोरोनामुळे ठप्प झालेला व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर येण्याआधीच पुन्हा एकदा ठप्प झाला आहे.

‘या’ राज्यांमध्ये बर्ड फ्लूची परिस्थिती

आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीला ‘बर्ड फ्लू’ झाला नाही, असा दावा सरकारने केला आहे. परंतु, ज्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूची खात्री झाली आहे, तेथील सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. या राज्यांमध्ये राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांचा समावेश आहे. काही अहवालानुसार केरळमध्ये सुमारे 12,000 बदकांचा मृत्यू झाला आहे. तर, हिमाचलमध्येही सुमारे दोन हजार स्थलांतरित पक्षी मरण पावले. राजस्थानच्या विविध जिल्ह्यात 250पेक्षा जास्त कावळ्यांचा जीव गेला. हरियाणाच्या पंचकुला येथे जवळपास चार लाख कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्येही बर्ड फ्लूने दरवाजा ठोठावला आहे. तर, केरळमध्ये बर्ड फ्लूला ‘राज्य आपत्ती’ घोषित करण्यात आली आहे. काही राज्यांमध्ये या संदर्भात इशारे देण्यात आले आहेत.

Popular posts from this blog