कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होणार! - जिल्हाधिकारी
माणगांव (उत्तम तांबे) : सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क/रुमाल न वापरणे, सार्वजनिक रस्ता, बाजार, रुग्णालय, कार्यालयत थुंकणे यासाठी आता दंड म्हणून रुपये 500 आणि सर्व दुकानदार, फळे, भाजीपाला विक्रेते तसेच जीवनावश्यक वस्तू विक्रेते यांना मास्क नसेल तर 200 रुपये दंड, दुकानात ग्राहक, व्यक्ती यांनी सामाजिक अंतर व साधारण 3 फुटाचे अंतर राखले नाही तर दुकानदार मालक, विक्रेता व ग्राहकाला 1000 रुपये पथका मार्फत आकारून शासकीय पावती लगेच देण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख निधी चौधरी यांनी जारी केले आहेत. गावपातळीवर गटविकास अधिकारी व नगरपालिका क्षेत्र मध्ये मुख्यधिकारी वसुली अधिकारी यांना ओळखपत्र देणार आहेत. त्याचबरोबर सध्या लग्न समारंभ सुरू असून हळद आणि लग्नाला 50 पेक्षा अधिक माणसे असतील आणि मास्क लावला नसेल तर प्रत्येक व्यक्ती दंड रुपये 200 आकरण्यात येणार आहे. यामध्ये नियमाचे उल्लंघन करतील अशा व्यक्तींविरूद्ध भा.दं.वि. कलम 188, 269 व 270 यांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 115 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल. रायगड जिल्ह्यात याची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आदेश देण्यात आले आहेत. अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला नाही. त्याचा संपूर्ण नायनाट झाला नाही म्हणूनच जिल्हाधिकारी रायगड यांच्या कार्यालयामार्फत कोरोना 2020/सूचना आदेश क्र. 436 दि. 9/12/20 रोजीच्या परिपत्रकानुसार आदेश जारी केले आहेत. तेव्हा रायगडच्या नागरिकांनो, आपले कुटूंब आपली जबाबदारी या शासनाच्या घोषणेचे काटेकोरपणे पालन करून कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.