संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर माणगांव पोलीसांचे कडक पथसंचलन

उत्सवाच्या काळात समुदायाने एकत्र येऊ नका, जमाव करु नका असा दिला संदेश


माणगाव, दि. ९ एप्रिल (उत्तम तांबे) :
सध्या पूर्ण जगभरात तसेच भारतामध्ये कोरोना सारख्या महामारी रोगाने थैमान घातले आहे. मुंबई-पुणे याठिकाणी आधिक रुग्ण आढळून येत असल्याने महाराष्ट्र शासनाने पूर्ण राज्यामध्ये सुमारे पंधरा दिवस संचारबंदी लागू केलेली आहे. तरीदेखील कोरोना सारखे महामारीच्या रोगांच्या संख्येमध्ये पुणे-मुंबई शहरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. संसर्ग तसेच प्रशासनाचे बदलणारे अध्यादेश व नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या-दृष्टीकोनातून पोलीसांची व संपूर्ण पोलीस  प्रशासनाची सद्यस्थितीत असणारी भुमिका अनन्यसाधारण आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय भुमिकेत असणारी खाकी वर्दी, समाजहितासाठी नागरीकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असते.


याचेच ज्वलंत दर्शन घडविताना माणगांव तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने दि. ८ एप्रिल रोजी माणगांव पोलीसांनी काढलेल पथ संचलन (रूट मार्च) पोलीस ठाणे ते शहरातील वाहतूक पोलीस चौकी ते निजामपूर रोड, कॅनाॅल, साईनगर ते पोलीस ठाणे व कचेरी रोड मुंबई-गोवा हायवे असा मार्च होऊन वाहतूक पोलीस चौकीसमोर पोलीस परेड ने समाप्त झाला. हा रूट मार्च माणगांव पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे व पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बुरुंगळे यांच्या उपस्थितीत काढण्यात आला.

या परेडमध्ये ४५ पोलीस कर्मचारी व ३ पोलीस अधिकारी तोंडाला मास्क लावून सहभागी झाले होते. या रूट मार्च मध्ये सुरक्षित अंतर ठेऊनच पथसंचलन काढण्यात आले होते. तसेच  रूट मार्च हा कोरोना लाॅकडाऊनच्या पार्श्वभुमीवर हनुमान जयंती व शब-ए-बारात या उत्सवांच्या काळात लोकांनी समुदायाने एकत्र येऊ नये. कोणत्याही प्रकारचे जमाव करू नये, आरोग्याची काळजी घ्यावी, या विषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने काढला असल्याचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog