कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यास रायगड जिल्हा प्रशासन कटीबद्ध - जिल्हाधिकारी निधी चौधरी
माणगांव (प्रतिनिधी) :
कोराेना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन-प्रशासन मिळून अहोरात्र विविध उपाययोजना राबवित आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनही सुरू आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी निराश्रित, मजूर, कामगार वर्गही अडकलेला आहे. मात्र त्यांची काळजी घेण्यास, त्यांच्यापैकी एकही मजूर उपाशी राहणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले.
माणगाव तालुक्यातील एका मजूर कॅम्पला त्यांनी नुकतीच भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, तहसिलदार प्रियांका आयरे-कांबळे या उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मजूर कॅम्पची पाहणी केली व मजूरांशी संवादही साधला. तसेच, तहसिलदार प्रियंका आयरे-कांबळे व अन्य संबंधितांना सूचना दिल्या की, एकही मजूर उपाशी राहणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी. मजूरांचे आवश्यक ते फॉर्म भरून त्यांची परिपूर्ण माहिती तयार करावी. कॅम्प मधील मजूरांची, त्यांच्या लहान मुलांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करावी. घरातील वृद्ध व्यक्ती व लहान मुले यांची विशेष काळजी घ्यावी. हे सर्व करीत असताना सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी, मास्क वापरावेत, त्याचप्रमाणे सोशल डिस्टंन्सिंगबाबतच्या सूचनाही काटेकोरपणे पाळाव्यात. कोराेनाविरुद्ध आपण सर्व एकजुटीने लढा देत आहोत आणि या पुढेही देणार आहोत, असेही त्या शेवटी म्हणाल्या.
या भेटीवेळी जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी मजूर कॅम्पमध्ये दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांचीही पाहणी केली. मजूरांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि मजूरांनी घाबरू नये, प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेईल, असा विश्वासही उपस्थित मजूरांना दिला.