तहसिलदार प्रियंका आयरे यांच्या हस्ते माणगांव येथे शिव भोजन थाळी केंद्राचे उदघाटन
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य या विभागाद्वारे राज्यातील गरीब व गरजू जनतेला अत्यंत सवलतीच्या दरात शिव भोजन थाळी योजना उपलब्ध करून देण्याचे महाराष्ट्र शासनाच्या विचारधीन होते. या बाबत शासनाने ठराव संमत करून सर्वानुमते ही योजना शिक्कामोर्तब केली.
गोरगरीब, कष्टकरी वर्गातील लोकांसाठी शासनाने मंजूर केलेल्या सदर योजनेचा लाभ माणगाव तालुक्यातील जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी माणगांव शहराच्या च्या मध्यवर्ती ठिकाणी निजामपूर रोड येथे बुधवार दि.१ एप्रिल २०२० रोजी शिव भोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले. सदर शिवभोजन थाली केद्राचे उदघाटन माणगांवच्या तहसिलदार प्रियंका आयरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी माणगांव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, आरोग्य सभापती रत्नाकर उभारे, पत्रकार अनिल मोकाशी, गौतम जाधव पद्माकर उभारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदरची शिवभोजन थाळी दहा रुपये प्रतीथाली याप्रमाणे देण्यात येणार होते. परंतू सध्या संपूर्ण देशासह महाराष्ट्रात पसरलेल्या कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव पार्शभूमीवर संपूर्ण देशात लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदीच्या काळात गरीब व गरजूंना सदर थाळी सद्या पाच रुपये दरामध्ये माणगाव येथील सौ. सुविधा सुधाकर उभारे यांनी सुरू केलेल्या साई सुविधा शिव भोजन थाली केंद्राद्वारे प्राप्त होणार आहे.
सदर शिवभोजन थाळीचे स्वरूप म्हणजे या थाळीत दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक मूठ भात व एक वाटी वरण एवढे पदार्थ या थाली बरोबर फक्त पाच रुपयात दिले जाणार आहेत.
माणगाव मधील गरीब व गरजू लोकांची पाच रुपयामध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आल्यामूळे माणगांव तालुक्यातील जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे. तरी तालुक्यातील सर्व गोरगरीब गरजू लोकांनी या शिवभोजन थाळीचा पाच रुपयात लाभ घ्यावा.

Comments
Post a Comment