नागरिकांनी स्वैराचार सोडून लाॅकडाऊनचे सर्व नियम  काटेकोरपणे पाळा आणि कोरोना व्हायरसच्या संसर्गासह लाॅकडाऊन टाळा !! 

बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात १४ एप्रिल पर्यंत २१ दिवसांचा लाॅकडाऊन सुरु केला आहे. मात्र काही नागरिक या लाॅकडाऊनचे सर्व नियम धाब्यावर बसवून दररोज राजरोस पणे घराबाहेर पडत आहेत. लोकांच्या अशा बेजबाबदार वर्तनामुळे महाभयंकर कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या गतीने वाढून संपूर्ण देशाचे एकूणच सामाजिक स्वास्थ्य धोक्यात यायला वेळ लागणार नाही.
      चीन मधील वुहान प्रांतात उदयास आलेल्या कोरोना व्हायरस या महाभयंकर संसर्गजन्य रोगाचा फैलाव बघता बघता संपूर्ण जगात सर्वत्र पसरला आणि चीन मधील वुहान सह इटली, फ्रांस, जर्मनी, अमेरिका, पाकिस्तान आणि भारतात इत्यादी देशात त्याने मृत्यूचे तांडव माजवून संपूर्ण जग हादरवून सोडले आहे. कोरोना व्हायरसने   भारताच्या मानाने इटली, फ्रांस, जर्मनी आणि संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवणार्या महासत्ताक अमेरिकेचे अक्षरशः सर्वार्थाने कंबरडे मोडले आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे या देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. त्यामुळे या देशांचे कोरोना व्हायरसमुळे कधीही न भरून येणारे असे नुकसान झाले आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतेही प्रभावी औषध न सापडल्याने जगातील सर्व प्रगत राष्ट्र या रोगापुढे अक्षरशः पूर्णपणे हतबल झालेली आपल्याला पहायला मिळत आहेत.
      कोरोना व्हायरसमुळे जगातील सर्व प्रगत आणि महासत्ताक असलेल्या राष्ट्राची ही अवस्था असेल तर आपले काय होईल याची साधी कल्पनाच न केलेली बरी. जगातील सर्व देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे बाधीत झालेल्या आणि मृत्यू पावलेल्या निष्पाप नागरिकांचा वाढता आकडा ऐकून अंगावर काटा येतो. कोरोना व्हायरसच्या या वाढत्या प्रसाराला सर्वस्वी त्या त्या ठिकाणच्या नागरिकांचे स्वैराचारी बेजबाबदार वागणे बहुतांशी जबाबदार ठरत आहे असे समोर येत आहे.
      कोरोना विषाणूचा संसर्ग, फैलाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे समस्त मानव जातीच्या हिताचे आहे. म्हणून भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर केलेले लाॅकडाऊन संचारबंदीचे पालन, दिलेल्या सूचना अर्थात अत्यावश्यक बाब वगळता कोणत्याही कारणासाठी घराबाहेर न पडणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, तोंडाला मास्क लावणे, वारंवार सॅनिटाइजरने स्वच्छ हात धुणे, शारिरीक स्वच्छता ठेवणे, प्रत्येक व्यक्ती मध्ये ठराविक अंतर ठेवून राहणे तथा सोशल डिस्टन्सचे आणि आपले स्वैराचारी बेजबाबदार वागणे सोडून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे, सर्व प्रकारच्या शासकीय यंत्रणेला सर्वोतोपरी सहकार्य करणे हे अत्यंत गरजेचे आहे. आपण असे केले तरच आपण कोरोना व्हायरसचे आपल्या देशातून समूळ उच्चाटन करून कोरोना विषाणू विरोधातील ही लढाई आपण जिंकून कोरोनाची हार करू शकतो अन्यथा आपली सुद्धा इटली, फ्रांस, जर्मनी आणि अमेरिकेसारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून नागरिकांनी आपले स्वैराचारी बेजबाबदार वागणे सोडून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाने आपल्याला दिलेल्या सर्व सूचना अत्यंत काटेकोरपणे पाळा आणि लवकरच कोरोनासह  लाॅकडाऊन टाळा.

Popular posts from this blog