ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨
डॉ. अजय मोरे यांची चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या कोकण अध्यक्षपदी निवड

माणगाव (महेश शेलार) :-
आपल्या अष्टपैलू कर्तृत्वाने संगणक, शिक्षण, सामाजिक, कला, क्रीडा, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात विविध उपक्रम राबवून जिल्हा, राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर माणगावसह संपूर्ण रायगड जिल्ह्याचे नावलौकीक केलेले व्यक्तिमत्व म्हणजेच रायगड भूषण डॉ. अजय आत्माराम मोरे यांचा शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी २०२०  रोजी बालगंधर्व नाट्य मंदिर, पुणे येथे संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे व अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष - मेघराज राजे भोसले, श्री.वबाबासाहेब पाटील, मित्र परिवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या कोकण अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांना भव्यदिव्य कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. तसेच खा. सुनिल तटकरे यांच्या आशिर्वादाने राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदितीताई तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांनी दखल घेतल्यामुळे गेली ११ वर्षे सलग करीत असलेल्या सांस्कृतिक व चित्रपट क्षेत्रातील कार्याची व आयुष्यातील सर्वोत्तम पोहच पावती मिळाली. माणगांवमध्ये संगणक शिक्षणाची क्रांती करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा जन्म 11 जून 1982 मध्ये माणगाव जवळील तळेगाव या गावी एका सामान्य कुटुंबात झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत स्वतःच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत केवळ जिद्द, चिकाटी आणि ध्येयशक्ती या गुणांवर संगणक क्षेत्रातील डॉक्टरेट प्राप्त केली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्राच्या प्रगतीत परावर्तित करण्यासाठी आणि ते कोठेही कमी पडू नयेत यासाठी स्वतः पुढाकार घेऊन मोरे एज्युकेशन सेंटरची स्थापना केली. या संस्थेमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थी, तरुण -तरुणी व्यवसायिक व नोकरदार व्यक्ती आधुनिक ज्ञान ग्रहण करत आहेत. आज या सेंटरमध्ये शिक्षण घेतलेले अनेक जण दुबई, मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यात नोकरी, व्यवसायात स्थिरस्थावर झाले आहेत.
संगणक क्षेत्राबरोबर नाट्य, अभिनय क्षेत्राची प्रचंड आवड आणि या आवडीतून "अष्टविनायक कला अकादमी" त्यांनी सुरू केली. माणगाव सारख्या ग्रामीण भागातील कलाकारांना अभिनय क्षेत्रात संधीचे सोनं करण्यासाठी एक व्यासपीठ यानिमित्ताने नवोदित कलाकारांना मिळाले आहे. या अकादमीमार्फत मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधनाची चळवळ अविरत सुरू आहे. जय हो, गौरव मराठी कलेचा,  धुमाकूळ मनोरंजनाचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा कार्यक्रम सुरू आहे. जय हो कार्यक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रात 150 पेक्षा अधिक प्रयोग सादर झाले आहेत. कला अकादमीच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, शॉर्टफिल्म त्यांनी केले आहेत. लास्ट वन, जिद्द, ख़ुशी यांसारख्या सामाजिक संदेश देणाऱ्या शॉर्ट फिल्म त्यांनी तयार केल्या आहेत. रायगडच्या मातीतील ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांच्या माहितीचा वारसा जगाला समजावा या दृष्टीने 'रायगडची माती' ही वेब सीरीज स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन सुरू केली आहे. या वेब सिरीजला चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यांचा सामाजिक संदेश देणारा आणि पूर्ण मनोरंजन करणारा 4G नावाचा चित्रपट तयार होत आहे. उत्तम कलाकार, संगीतकार, लेखक घेऊन त्यांनी महत्वाकांक्षी असा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक ते स्वतः आहेत.

शिक्षण आणि कला क्षेत्रात रमणारे डॉ. अजय मोरे हे अजातशत्रू असून सामाजिक क्षेत्रातही ते त्याच हिरीरीने अग्रेसर आहेत. आपल्या समाजाच्या गरजा ओळखून समाजाला वेगळी दिशा देण्याचे काम ते करत आहेत. अनेक सामाजिक संघटनाना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. स्वतःच्या सेंटरच्या वतीने दहावी व बारावीतील परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करतात. सावित्रीबाई फुले योजना अंतर्गत दरवर्षी युवती व महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण आयोजित करतात. तरुणांना रोजगार मार्गदर्शन केंद्र चालवून नवी दिशा देतात. धकाधकीच्या या जीवनात कमी होत जाणारा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन वाढावा यासाठी व्यक्तिमत्व विकास, सकारात्मक विचार कार्यशाळा आयोजन आणि व्याख्याने देतात यातून त्यांनी अनेक जणांना जगण्याची नवी दिशा दिली आहे.
जिंकणारा कधी थांबत नसतो, थांबणारा कधी जिंकत नसतो ! या ब्रीदवाक्यवर अविरत विश्वास ठेवणारे डॉ. अजय मोरे हे सामाजिक, सांस्कृतिक, कला आणि सामाजिक क्षेत्रातील खरे माणिक - मोती आहेत. त्यांनी याचे सर्व श्रेय आपले आई-वडील, पत्नी, मुले व मित्र परिवार, हितचिंतक यांना दिले आहेत.
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या कष्टाळू व्यक्तिमत्वाला देशाच्या विकासासाठी कार्य करत असल्याबद्दल मोदी पुरस्कार, लास्ट वन शॉर्ट फिल्मसाठी सिंगापूर येथील स्क्रीनिंग पुरस्कार, महाराष्ट्रातील चित्रपट महासंघ आणि साईसागर इंटरटेन्मेंट यांचा स्टार महाराष्ट्राचा पुरस्कार, सावित्रीबाई फुले सामाजिक पुरस्कार 2008, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कार 2009, ज्येष्ठ पत्रकार र.वि.तांबे समाज गौरव पुरस्कार 2010, आदर्श संगणक शिक्षक पुरस्कार 2012, एकता समाजसेवा पुरस्कार 2012, सामाजिक माणिकमोति पुरस्कार 2012, शिक्षण रत्न पुरस्कार 2012, समाज भूषण पुरस्कार 2012, महाराष्ट्र सुवर्ण गौरव पुरस्कार 2015, राजा शिवछत्रपती समता पुरस्कार 2015 आणि रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण पुरस्कार 2015 असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले असून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची शासन स्तरावर, देश-विदेशांतून आणि सामाजिक संघटनांनी दखल घेतली आहे.

Comments

Popular posts from this blog