ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

विवा कॉलेज माणगांव येथे वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, चित्रकला व निबंध स्पर्धा

चेअरमन विनया विवेक ढेपे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन 

 ​'एक विद्यार्थी, एक वृक्ष' संकल्प 

लोणेरे-माणगांव, दि. १२ (राम भोस्तेकर) :- प्रोफेशनल एज्युकेशन सोसायटी संचलित विवा कॉलेज, माणगांव येथे संस्थेच्या चेअरमन विनया विवेक ढेपे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धेचा समावेश होता. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि महाविद्यालय प्रशासनाच्या नियोजनामुळे संपूर्ण परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता वृक्षारोपणाने झाली. महाविद्यालय परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देत प्रत्येक विद्यार्थ्याने पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देण्याचा संकल्प केला. "एक विद्यार्थी – एक वृक्ष" हा संदेश देत भविष्यातही वृक्षांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.

यानंतर महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिसराची स्वच्छता करत स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून साकारली. स्वच्छ परिसर, निरोगी जीवन आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमातील चित्रकला व निबंध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. स्पर्धकांनी पर्यावरण संरक्षण, जलसंवर्धन, स्वच्छता, सामाजिक मूल्ये, राष्ट्रप्रेम आणि नागरिकांची कर्तव्ये अशा विविध विषयांवर प्रभावी चित्रे आणि विचार मांडले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, सामाजिक जाणिवेचे आणि सर्जनशीलतेचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

याप्रसंगी चेअरमन विनया विवेक ढेपे, उपाध्यक्ष डॉ. विवेक ढेपे, प्राचार्य प्रा. योगेश रानभरे तसेच उपविभागप्रमुख प्रा. प्रसाद तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले. महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी सर्व उपस्थितांनी पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय मूल्ये जपण्याची सामूहिक शपथ घेतली. महाविद्यालयाच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्व, पर्यावरण संरक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक मूल्यांची जोपासना करण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेले हे उपक्रम सर्वांच्या सहभागामुळे अत्यंत यशस्वी ठरले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता आणि राष्ट्रहिताची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog