समाजसेवक बिलाल मोरबेकर यांचा पुणे येथे 'समाजरत्न' पुरस्काराने गौरव
रोहा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
रोहा, दि. ३१ (प्रतिनिधी) :- माणुसकीचा झरा आणि निस्वार्थ सेवेचा अखंड वारसा जपणारे रायगड जिल्ह्यातील रोह्याचे सुपुत्र बिलाल अकबर मोरबेकर यांच्या कार्याची मोहोर आता पुणे शहरातही उमटली आहे. निमित्त होते 'महाराष्ट्र पोलीस न्यूज २४' या डिजिटल वृत्तवाहिनीच्या तृतीय वर्धापन दिनाचे, जिथे मोरबेकर यांना त्यांच्या अतुलनीय सामाजिक योगदानाबद्दल अत्यंत मानाच्या 'समाजरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २२ मार्च २०२६ रोजी पुण्यातील एका दिमाखदार सोहळ्यात हा गौरव सोहळा पार पडला. याप्रसंगी वृत्तवाहिनीच्या संपादिका स्मिता बाबरे आणि राज्य संपादक रमेश गणगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार प्रदान करताना उपस्थितांनी उभे राहून बिलाल भाईंच्या कार्याला दाद दिली, ज्यामुळे रोहा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बिलाल भाई मोरबेकर यांचा जीवनप्रवास हा 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' याचे जिवंत उदाहरण आहे. पेशाने रिक्षाचालक असलेल्या बिलाल भाईंनी गरिबी आणि संघर्षाचे दिवस अनुभवले आहेत, परंतु या परिस्थितीतही त्यांनी आपल्यातील माणुसकी कधीही हरवू दिली नाही. रिक्षा चालवताना रस्त्यावर होणारे अपघात असोत किंवा रात्री-अपरात्री उपचारासाठी वणवण करणारे रुग्ण असोत, बिलाल भाई नेहमीच देवदूतासारखे धावून आले आहेत. अनेकदा स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून आणि रिक्षामधील प्रवाशांची किंवा वेळेची पर्वा न करता त्यांनी गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या या तत्परतेमुळे आजवर अनेकांना जीवनदान मिळाले असून, रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही प्रसिद्धीची हाव न धरता किंवा कोणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता बिलाल भाईंनी आपले हे कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. समाजातील उपेक्षित आणि गरजू घटकांसाठी ते एक आधारस्तंभ बनले आहेत. त्यांच्या या निस्वार्थ कार्याची दखल राज्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक राजधानीत घेतली गेल्याने रायगडकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. हा पुरस्कार स्वीकारताना बिलाल भाई भावूक झाले होते, मात्र त्यांचा हा सन्मान म्हणजे प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचे आणि सेवेचे फळ असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. पुण्यातील या गौरव सोहळ्याची बातमी समजताच संपूर्ण रायगड जिल्ह्यातून, विशेषतः त्यांच्या मित्रपरिवारातून आणि समाजसेवकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. केवळ पुरस्कारापुरते मर्यादित न राहता, बिलाल भाईंचे हे कार्य येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी आशा या निमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे.

Comments
Post a Comment