रेल्वे उड्डाणपूलाच्या पर्यायी मार्गाची दुरावस्था 

पावसाळी खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडी


रोहा (प्रतिनिधी) :- जानेवारी २०२२ मध्ये भुमिपूजन झालेले रोहा नागोठणे मार्गावरील रेल्वे उड्डाणपूलाचे काम गेले अडीच वर्षे अत्यंत मंदगतीने चालू आहे. आता पावसाने चांगलाच जोर धरला असून उड्डाणपूलाच्या ठिकाणी ठेकेदाराने केलेल्या पर्यायी मार्गाची पुर्णपणे दुरावस्था झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून चिखल आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यातून दूचाकी धारक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करित आहेत. या रस्त्यावर खड्ड्यात पडून दररोज अनेक अपघात होत आहेत. वाहन धारकांना तसेच नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती द्यावी आणि पर्यायी मार्गाचे मजबूतीकरण करावे, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांच्या वतीने होत आहे. 

रेल्वे उड्डाणपूलाचा ठेकेदार मे. आर. के. मधानी व एमआरआयडीसीचे अधिकारी यांच्या दुर्लक्षीतपणामुळे उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या अडीच वर्षांपासून पूर्ण झाले नाही. सलग तिसऱ्या पावसाळ्यात नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. उड्डाणपुलाचे बांधकामामुळे वाहतूकीचा रस्ता अरुंद वळणाचा आणि खाचखळग्यांचा झाला आहे, इथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अनेक अपघात होत आहेत. कामाची प्रगती कासवगतीने चालू असून नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

Popular posts from this blog