कायदा सुव्यवस्थेला फाट्यावर मारून पनवेल, नवी मुंबईत जुगार क्लब सुरू

राज क्लब, कपल क्लब, विनम्र क्लब जोमात आणि पोलीस गेले कोमात? - अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- नवीमुंबई पनवेल येथे सोशल क्लब च्या नावाखाली पनवेल सुकापूर येथील राज क्लब, पनवेल येथील कपल क्लब आणि कामोठे येथील विनम्र क्लब येथे बेकायदा जुगाराचा धंदा जोमात सुरू असून त्याविरूद्ध कोणतीही कारवाई होत नसल्याने पोलीस कोमात आहेत का? नियम फक्त सामान्य लोकांसाठी असतात का? पनवेल येथील जुगार क्लबचालकांचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि गृहमंत्री यांच्याशी लागेबांधे आहेत का? असा प्रश्न प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
येथे 3 पत्ती, 13 पत्ती पॉईंट रम्मी, 21 पत्ती पॉईंट रम्मी, 27 पत्ती पॉईंट रम्मी हे जुगाराचे गेम खेळले जात असून येथे 10 रू, 20 रू, 50 रू, 100 रू, 200 रू, 500 रू. अशा पॉईंटने जुगार खेळला जात आहे. येथील जुगाराच्या व्यसनाने अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले असून येथे जमावबंदीचे आदेश पायदळी तुडवून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी या बेकायदा प्रकारांना पाठबळ दिल्याचे स्पष्ट होत चालले आहे.
मा. मुख्यमंत्री, मा. गृहमंत्री, मा. पोलीस महासंचालक यांच्याकडे वारंवार तक्रारी दाखल होऊनही याप्रकरणी कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे यामध्ये खूप मोठी "सेटींग" असल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या बेकायदा जुगाराच्या धंद्यांना पायबंद कोण घालणार? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. परिणामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनी याप्रकरणी विशेष पथक तयार करून हे बेकायदा जुगार क्लब कायमचे बंद करावेत अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.

Popular posts from this blog