आदिवासींच्या जमीन खरेदीसाठी इंदापूरच्या भूमाफीयांचा निजामपूर व रोहा विभागात सुळसुळाट! 

भूमाफीया तुपाशी आणि शेतकरी उपाशी

माणगांव : प्रमोद जाधव 

रायगड जिल्ह्यातील भौगोलिक दृष्ट्या केंद्रबिंदू असणारा माणगांव तालुका व नजीक असणारे रोहा व तळा तालुके यांमध्ये आगामी काळात राज्य शासन व केंद्रशासन यांच्यामार्फत अनेक प्रकल्प होऊ घातले आहेत. यामध्ये अनेक प्रकल्पांंकरिता आगामी काळात भूसंपादन होऊ शकते याच धर्तीवर माणगांव तालुक्यात अनेक दिवस थंड असलेले इंदापूर विभागातील भूमाफिया पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र माणगांव तालुक्यात दिसून येत आहे.

माणगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी अनेकविध शासकीय प्रकल्पांकरिता हस्तांतरीत करण्यात आल्या, मात्र शासन मोबदला आणि प्रत्यक्षात शेतकरी यांच्या हातात पडलेला मोबदला रक्कम यामध्ये जमीन अस्मानाची तफावत असल्याची चर्चा देखील माणगांव, रोहा व तळा तालुक्यात चालू आहे. यामध्ये खरी परिस्थिती पाहता ज्याच्या मालकीची शेती तो शेतकरी उपाशी आणि भूमाफीया (एजंट, डाकू) तुपाशी...! अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माणगांव रोहा तालुक्यातील मुंबई गोवा महामार्ग, दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आणि कोकण रेल्वे दुपदरीकरण याकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्यानंतर माणगांव तालुक्यातील इंदापूर विभागातील लोण्याचा गोळ्यावर डोळा ठेवून असलेल्या भूमाफीयांचा मोर्चा सध्या आदिवासी जमीनीवर असल्याची चर्चा माणगांव तालुक्यात सुरू आहे. 

यामध्ये या जमिनी खरेदीसाठी दिल्ली आणि मुंबई येथून खरेदीदार येत आहेत. मात्र छुपे रुस्तुम असलेले हे एजंट,भु-माफिया आदिवासी तत्सम (ST) समाजातील लोकांच्या नावे या आदिवासी जमिनीची खरेदी करून घेत आहेत. जेणेकरून आगामी प्रकल्पाकरिता ही आदिवासी जमीन सहज हस्तांतरीत होऊ शकते कदाचित अशी शक्कल अशा लबाड भु-माफियांनी लावली असावी. यामध्ये माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागातील गावे, रोहा तालुक्यातील जामगाव, जावटे यांसारखी गावे, तर तळा तालुक्यातील बहुतांशी गावे व त्यातील आदीवासी जमिनी यावर इंदापूर विभागातील भूमाफीयांनी डोळा ठेवला आहे आणि कार्यक्रम देखील सुरू केला आहे.

आदिवासी हे जंगल चे राजे आहेत.त्यांची जमिनी बिगर आदीवासी अथवा कोणीही खरेदी करू शकत नाही. आदीवासी ज्या जागेत राहील ती त्याची जमीन! आदिवासींच्या मूलभूत अधिकारांसाठी आदीवासी वन अधिनियम २००५ देखील लागू आहे. मात्र कायद्यातील पळवाटा आणि इतर गोष्टींचा फायदा घेत हे भु-माफिया गोरगरीब आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आदिवासी समाजाकरिता विविध सामाजिक उपक्रम व योजना आदीवासी समाजात तळा-गाळापर्यंत पोहचविण्यासाठी विविध सामाजिक संस्था व स्थानिक आदिवासी संघटना कार्यरत आहेत.त्यामुळे माणगाव तालुक्यात व इतर तालुक्यात आदीवासी जमिनिंच्या सध्या चालू असलेल्या या प्रकाराबद्दल समाजाला माहिती देऊन जागरूक करावे. कारण या जमीन खरेदी प्रकारामध्ये हे लुटारु, एजंट, भूमाफीया आदिवासी समाजाचा माणूसच पुढे करत आहेत. जेणेकरून भोळा-भाभडा आदिवासी समाज आपली जमीन सहज आपल्या बांधवांला देऊ शकतो. मात्र याबाबत आदिवासी समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे. अशी मागणी माणगांव तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, संघटना व सुजाण पत्रकार संघटना यांच्याकडून जोर धरू लागली आहे.

Popular posts from this blog