विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी दिघी सागरी पोलिसांनी सहा तरुणांना नेले थेट दवाखान्यात
बोर्ली पंचतन (मुझफ्फर अलवारे) : एकीकडे राज्य शासनाने नियम घालून दिले शिवाय, रात्रीची संचारबंदी यापुर्वीच लागू झालेली आहे. तरी देखील अनेकजण कारण नसताना बाहेर फिरतात. या पार्श्वभुमीवर श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरात संध्याकाळच्या वेळी रस्त्यावरून फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यास सुरवात केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर राज्यात गेल्या महिनाभरापासून कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून रात्री घराबाहेर पडण्यावरही निर्बंध होते. तरी देखील घराबाहेर पडणारे नागरिक सर्रासपणे रस्त्यावरून फिरताना अनेक ठिकाणी पाहायला मिळत होते. पोलिसांनी यावर शक्कल लढवली. दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी संचारबंदीच्या काळात जे नागरिक रस्त्या बाहेर फिरत असतील अशांची त्याच ठिकाणी रॅपिड ॲटिजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी संध्याकाळी सहा तरुण बिनकामाचे फिरताना आढळून आले त्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक शेख व वाहतूक पोलीस भोकारे यांनी तरुणानं ताब्यात घेऊन थेट बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करण्यासाठी नेण्यात आले. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या डॉ. तांबे यांनी लगेच कोरोना चाचणी केली.
संचारबंदीच्या काळात बाहेर निघणाऱ्यांवर अंकूश लावण्यासाठी पोलिस प्रशासनाने ही नामी शक्कल लढविली आहे. संचारबंदीच्या कालावधीमध्ये नागरिक बाहेर फिरत आहेत अशा नागरिकांना पकडून त्यांची रॅपिड ॲटिजेन टेस्ट केली जात आहे.
पॉझिटीव्ह आल्यास तेथूनच विलगीकरण कक्षात
– रस्त्यावर तपासणी केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांना विलगीकरण कक्षामध्ये भरती केले जाणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण सापडतील आणि इतरांना त्यांच्यापासून प्रसार होणार नाही; हा मुख्य उद्देश आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत 6 जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या असून त्यामध्ये कुणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही.
पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना आव्हान
– जिल्हा प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊन काळात नियमानुसार अत्यावश्यक सेवेत असलेल्या आस्थापनांनाच परवानगी आहे. त्यांनीच दुकाने उघडी ठेवावीत. विनाकारण रस्त्यांवर काम नसताना फिरू नये. मास्क लावणे सक्तीचे आहे. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे. घरात राहणे अत्यंत सुरक्षित आहे. पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडू नका, असे आवाहन दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी केले आहे.