तळा नगरपंचायतीत भाजपाचा जय होणार? माजी सरपंच ॲड. दिव्या रातवडकर यांचा भाजपा प्रवेश
तळा (संजय रिकामे) : तळा नगरपंचायत लागण्यापूर्वी अजूनही काही राजकीय भूकंप होण्याची चिन्हे असून काही जण भाजपाचा जय होणार म्हणणार असल्याची चिन्हे आहेत. परिणामी भविष्यात तळा नगरपंचायतीमध्ये सत्ताकारणात उलथापालथ होणार आहे. या राजकीय घडामोडींमुळे भाजपाच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
सौ. दिव्या रातवडकर,ॲड. निलेश रातवडकरांमुळे समीकरणे बदलणार
तळा तालुक्यात भाजपाने मुसंडी मारण्यास सुरवात केली आहे. काही ग्रामपंचायतीवर आपले सरपंच निवडून आणल्यानंतर आता मात्र तळा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच ॲड. सौ. दिव्या रातवडकर आणि अॅड. निलेश रातवडकर या दांपत्याला भाजपाने आपल्या पक्षात खेचून घेतल्याने भाजपा तळा नगरपंचायतीवर आपली सत्ता आणणार असा विश्वास तळा तालुका भाजपा अध्यक्ष कैलास पायगुडे यांनी व्यक्त केला आहे.
तळा ग्रामपंचायत ते नगरपंचायत स्थापनेपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला आहे. आता मात्र पहिल्यांदाच भाजपाने तळा शहरात राजकीय चाणक्य म्हणून ओळख असणारे अॅड. निलेश रातवडकर आणि त्यांच्या पत्नी माजी सरपंच ॲड. सौ. दिव्या रातवडकर आणि त्यांचे सहकारी यांनी मुंबई येथे विरोधी पक्ष नेते आ. प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपा तळा तालुका अध्यक्ष कैलास पायगुडे, माणगांव तालुका अध्यक्ष अप्पा ढवळे, शहर अध्यक्ष सुधीर तळकर, श्री. लोखंडे, क्ल्पेश रातवडकर, दुर्गेश रातवडकर, राकेश रातवडकर आदि मान्यवर उपस्थित होते. या पक्ष प्रवेशामुळे तळा नगरपंचायतीत भाजपाची ताकद लक्षणीय वाढली आहे. नगरपंचायतीत भाजपाचे कमळ फुलण्याची आशा उंचावली आहे. अॅड.निलेश रातवडकर आणि त्यांच्या पत्नी माजी सरपंच ॲड. सौ. दिव्या रातवडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तळा नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. रातवडकर यांच्याप्रमाणेच आणखी कोण भाजपमध्ये प्रवेश करणार याबाबत चर्चा होत आहेत.
शासनाने तालुक्याच्या मुख्यालई असलेल्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर केले जेणेकरुन त्या शहराचा विकास व्हावा अशी अपेक्षा होती. मात्र ज्याप्रमाणे तळा नगरपंचायतीचा कारभार चालू आहे त्यापेक्षा ग्रामपंचायत बरी होती असे मत नागरीकांकडून व्यक्त केले जात आहे. तळा शहरात पाणी पुरवठा प्रश्न गंभीर आहे. भर पावसात पाणी टंचाईची समस्या आहे. शहरातील खराब झालेले रस्ते अनधिकृत बांधकामे अतिक्रमणे, डंपींग ग्राउंड, लाईटची समस्या या सर्वच बाबतीत नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत सत्ताधारी पक्ष आपली भूमिका मांडत नाही. दुसरिकडे गेली पाच वर्षे राष्ट्रवादी पक्ष हा तळा नगरपंचायतीमध्ये विरोधी बाकावर बसला आहे. जनतेचे प्रश्न समस्या प्रभावीपणे मांडुन जनतेला न्याय मिळवून देणे प्रसंगी आंदोलने आणि मोर्चे काढुन सत्ताधारयांना सळो की पळो करुन सोडण्याचे काम विरोधकांचे असताना त्याप्रकारची आक्रमक भूमिका घेताना राष्ट्रवादी पक्ष गेली पाच वर्षे दिसला नाही त्यामुळे शिवसेना आणि रााष्ट्रवादी काँँग्रेस या दोन्ही पक्षांनी तळेवासीयांंचा भ्रमनिरास केला असून भारतीय जनता पक्षाने योग्य व्युहरचना करुन चांगले उमेदवार दिले तर तळा नगरपंचायतीत सत्ता पलटण्यामध्ये वेळ लागणार नाही असे बोलले जात आहे.