महाराष्ट्रातील पारंपरिक शाहीरी कलेची होणार जपणूक
रायगडातील शाहीरांचा माणगावात मेळावा, एकतेचा निर्धार!
रायगड (भिवा पवार) :
महाराष्ट्रातील लोककला टिकली तरच महाराष्ट्राची संस्कृती टिकेल. लोकलला ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. तो चिरकाल टिकावा. लोककलेला चालना मिळावी या उदात्त हेतूने तसेच या संगणकाच्या युगात, आंतरजालाच्या महामायेत गुंतलेल्या नवीन पिढीला महाराष्ट्रातील सांस्कृतिक कला शाहीरीचा परिचय व्हावा, रायगड जिल्ह्यातील शाहिरी कला, सांस्कृतिक नर्तनाच्या माध्यमातून लोकप्रबोधन, समाज प्रबोधन करणाऱ्या शाहीरांना एकत्र आणावे व त्यांचेही संघटन व्हावे या उद्देशाने माणगावातील कुणबी भवन येथे रायगड जिल्ह्यातील शाहीरांचा मेळावा संपन्न झाला.
हा मेळावा यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी आजच्या काळातील सोशल मिडियाचा वापर करून भरत गाणेकर, राजाराम रणपिसे, संतोष कळमकर, योगेश जाधव,चंद्रकांत कदम, उमेश पोटले, भालचंद्र दामा, देवजी मुंडे, हेमंत कांबळे, जगन्नाथ खारगावकर, मधुकर यादव, ज्ञानदीप भोईनकर, गणपत पवार आदी मान्यवरांनी एकत्रीकरण केले.
या मेळाव्याच्या उद्घाटन कला सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री. रामभाऊ टेंबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर कोलाड-रोहा सांस्कृतिक कला मंडळाचे अध्यक्ष सुरेश महाबळे, वाद-विवाद समितीचे अध्यक्ष सुरेश चिबडे, संतोष धारसे, शंकर जाधव, विजय पायकोळी, म्हस्के साहेब, रणपिसे सर, बाळा महाबळे योगेश जाधव, हिरू भोस्तेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या शाहीरी कलेच्या माध्यमातून होणारे लोकप्रबोधन, जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संरक्षण, शिवस्तुतितून निर्माण होणारे चैतन्य पाहता ही शाहीरी कला टिकली पाहिजे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. महाराष्ट्रासह रायगडातील कवीवर्य, शाहीरी ,नर्तन कला, सांस्कृतिक परंपरेचे जतन व्हावे, नवीन शाहीर निर्माण व्हावेत, शाहीरी कला विकसित व विस्तृत व्हावी याकरिता आपण महत्वपूर्ण योगदान या शाहीरांच्या संघटनेला देऊ. त्याचबरोबर या कलेला योग्य व्यासपीठ मिळण्यासाठी माणगांव सारख्या ठिकाणी एखादा रंगमंच उपलब्ध व्हावा याकरिता आपण पुढाकार घेऊ असे आश्वासन अध्यक्ष तथा कवी शाहीर रामभाऊ टेंबे यांनी दिले.
कोरोनाच्या महामारीत आपण उदबोधन करून या समाजातील निराधाराला आधार द्यावा. आपली शाहीरी कला मनोरंजना बरोबर सकल समाजाचा आधार ठरावा अशा मोठ्या उद्देशाने ही शाहीरांची संघटना आपण स्थापन करीत आहोत असे प्रतिपादन श्री. चंद्रकांत कदम बुवा यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानदीप भोईनकर व भालचंद्र दामा यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार उदय चिबडे यांनी मानले.