माणगांवच्या गजानन महाराज नगरमधील कुटूंब नुकसानभरपाईपासून वंचित, भरपाई द्यायला शासनाकडे पैसा नाही?
माणगांव तहसिल कार्यालयातील अधिकाऱ्यांना पाहिजे 'चहा-पाणी?'
माणगांव (प्रतिनिधी) : निसर्ग चक्रीवादळामुळे असंख्य नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले; तर अनेक कुटूंब बेघर झाले. त्यानंतर शासनातर्फे पंचनामे होऊन संबंधित कुटूंबांना नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. परंतु सर्व संबंधित कागदपत्रांची पूर्तता करूनदेखील सदर नुकसानभरपाई देण्यामध्येही माणगांव तहसिल कार्यालयातून पक्षपात केला जात असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलेली असून "नुकसानभरपाई मिळविण्यासाठी एकदा भेटून जा बरं का..!" असे बोलणारे विचीत्र कर्मचारी देखील माणगांव तहसिल कार्यालयामध्ये असल्यामुळे त्यांना चहा-पाणी पाहिजे का? असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे. माणगावच्या गजानन महाराज नगर, नाणोरे येथील फक्त ठराविक लोकांनाच नुकसानभरपाई मिळालेली आहे. पण काही कुटूंब आजदेखील नुकसानभरपाई मिळण्यापासून वंचित राहिलेली आहेत.
निसर्ग चक्रीवादळामध्ये गजानन महाराज नगर येथील सौ. ज्योती मंगेश मेस्त्री यांच्या घराचे नुकसान झाल्यानंतर येथील पोलीस पाटील भरत पाटोळे व शालेय शिक्षीका सौ. डोळस मॅडम यांनी शासनाच्या वतीने पंचनामा केला होता. त्यानंतर सदर पंचनामा याच परिसरातील प्राथमिक शिक्षीका सौ. नागे मॅडम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. मात्र येथे एक विचीत्र प्रकार घडला असून पंचनामा करून तयार करण्यात आलेल्या यादीतील नावे खाडाखोड करून गायब करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलेली असून माणगांव तहसिल कार्यालयातील अधिकाऱ्यांचाच त्यांना वरदहस्त असल्यामुळे या गैरप्रकाराविरूद्ध अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन नुकसानग्रस्त कुटूंबांना न्याय मिळवून द्यावा व याप्रकरणातील दोषी असलेल्या शिक्षक व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नुकसानग्रस्त कुटूंबांकडून करण्यात आली आहे.