माणगावमधील वादळग्रस्तांचे पंचनामे न करणाऱ्यांवर खासदार सुनील तटकरे यांचे सक्त कारवाई करण्याचे आदेश 


पत्रकारांच्या उपोषणाची खासदारांनी घेतली गंभीर दखल 


माणगाव (उत्तम तांबे) : माणगाव तालुक्यातील ३ जून २०२० रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळातील नागरिकांचे पंचनामे न करण्याबरोबरच त्यांचे पंचनामे गहाळ करणे व पूर्णतः पडलेले घर असताना त्यांचे अंशतः दाखवणे असे काम ज्या कोणी ग्रामसेवक, तलाठी यांनी केले असेल   त्यांच्यावर सक्त कारवाई करून त्यांचे निलंबन करा असे सक्त आदेश रायगड लोकसभा मतदार संघाचे खा.सुनील तटकरे यांनी माणगाव तहसीलदार यांना दिले आहेत. 

माणगाव तालुक्यातील पत्रकारांनी वादळग्रस्तांच्या प्रश्नांबाबत ७ सप्टेंबर २०२० रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. याची गंभीर दखल खा. तटकरे यांनी घेऊन सुरुवातीला माणगाव तहसील कार्यालय याठिकाणी अधिकारी व पत्रकार यांचे समवेत बैठक घेतली. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा रविवार दि.२३ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वा. सुतारवाडी येथील आपल्या निवासस्थानी खा. तटकरे यांनी पत्रकारांसमवेत बैठक घेतली. त्यावेळी खा. तटकरे व पत्रकार यांच्यात माणगाव तालुक्यातील वादळग्रस्तांच्या प्रश्नांबाबत दीड तास सखोल चर्चा झाली.

या बैठकीत पत्रकारांनी तालुक्यातील वादळग्रस्तांच्या प्रश्नांबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी खा. तटकरे यांनी सांगितले सर्वात जलद मदत रायगड वासियांसाठी मिळाली आहे. याकरिता आदरणीय नेते शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी तसेच पालकमंत्री आदिती तटकरे यांनी बोलून जिल्ह्यातील वादळग्रस्तांना जास्तीत जास्त मदत आणण्याचा प्रयत्न केला. मागील सरकारच्या काळात अंशतः पडझड झालेल्या घरांना ६ हजार रुपये मिळत होते. ते आता १५ हजार  रुपये मिळाले आहेत. पूर्वी कपडे व भांडी यांच्या नुकसानीला प्रत्येकी २५०० रुपये मदत होती. आता ही मदत महाविकास आघाडीच्या सरकारने प्रत्येकी ५ केल्याने १० हजार रुपये वादळग्रस्तांना मिळाले आहेत. त्यातच ज्यांचे पंचनामे जसे झालेत त्याप्रमाणे वादळग्रस्तांना मदतीचे वाटप  करण्यात आले आहे. ज्यांचे पंचनामे अधिक रुपयांचे असतील व त्यांना कमी मदत देण्यात आली असेल त्या वादळग्रस्तांना शासनाच्या निकषाप्रमाणे जरूर मदत देण्यात येईल. शाळा, अंगणवाड्या, फळझाडे, माध्यमिक शाळा, खाजगी संस्था, पोल्ट्री, समाजमंदिरे यांनाही टप्प्याटप्प्याने मदत मिळणार आहे. पूर्णतः घरे पडलेल्यांना आपण १० दिवसांत  मदत दिलेली आहे. त्यांचे पूर्णतः घर पडून त्यांचे अंशतः पंचनामे झाल्याचे कोणी सांगत असतील तर त्यांनी वादळ झाले त्यावेळचा व्हिडिओ अथवा फोटो सादर करावा. नवीन बांधकाम केल्याचा फोटो नको. तरी देखील त्या वादळग्रस्तांना कशी जास्तीत जास्त मदत मिळेल यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू. रायगड जिल्ह्यातील अडीच लाख वादळग्रस्तांना मदत देताना १० टक्के मानवी चूक झाल्या असतील हे मी नाकारत नाही. रायगड जिल्ह्याला  प्रथमच एवढ्या मोठ्याप्रमाणात मदत मिळाली आहे. कोरोनाचा संसर्ग नसता तर अजूनही आपण मदत आणली असती. तरी आपण भरपूर मदर आणण्याचा प्रयत्न केला.माणगाव तालुक्यातील वादळग्रस्तांसाठी ४५ कोटी रुपयांची मदत आणून बँक खात्यातील चुका सुधारून जलदगतीने वादळग्रस्तांना मदत देण्याच्या सुचना आपण तहसीलदार यांना दिले आहेत. यावेळी बोलताना खा. तटकरे यांनी पुढे सांगितले निसर्ग चक्री वादळाबाबत हवामान खात्याने सूचना केल्यावर मी असेन, पालकमंत्री आदिती, आ. अनिकेत असेल यांनी समुद्र किनारी लगतच्या गावांना एक दिवस अगोदरच स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या.त्यावेळी भरडखोल येथील बांधव पोलिसांचा ऐकत नव्हते. मग मी भरडखोल येथील हजारो मच्छिमार बांधवांना स्थलांतरित होण्यासाठी मोबाईलवरून तेथील मच्छिमार बांधवांना स्पीकर चालू ठेवायला सांगून मी त्यांच्याशी बोललो त्यानंतर ते मच्छिमार बांधव तेथून स्थलांतरित झाले. निसर्ग चक्रीवादळ झाल्यावर त्या मच्छिमार बांधवांचा असा फोन आला साहेब तुमच्यामुळे आमच्या हजारो जणांचे प्राण वाचले असे सांगत वादळात वीजपुरवठा खंडित झाल्यावर वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे मी व पालकमंत्री यांनी वेळोवेळी संपर्क साधला. पोल्ट्री धारकांच्या नुकसानीबाबत खा.तटकरे यांनी ना.सुनील केदार यांच्याशी या बैठकीत संपर्क साधून त्यांचे लक्ष वेधले.तसेच माणगाव तालुक्यातील पंचानाम्याबाबत ज्यांचे कोणाचे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी यांनी केले नसतील किंवा पंचनामे गहाळ केले असतील अथवा बाजूला ठेवले असतील अशांवर सक्त कारवाई करण्याबाबतचे आदेश लगेचच या बैठकीत माणगाव तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून दिले. खा. तटकरे यांनी वादळग्रस्तांच्या प्रश्नांबाबत पुढे येणाऱ्या माणगाव तालुक्यातील पत्रकारांशी मध्यस्थी करून पत्रकारांच्या विविध मागण्यांना यश आल्याने तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार अरुण पवार यांनी खा. तटकरे यांना आपण केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे आम्ही पत्रकार ७ सप्टेंबरला उपोषण स्थगित करीत असल्याची घोषणा केली. या बैठकीत माणगाव तालुक्यातील पत्रकार  सलीम शेख, प्र. सल्लागार अरुण पवार, मजिद हाजिते, कार्याध्यक्ष पद्माकर उभारे, सचिन देसाई, आजेश नाडकर, माणगाव प्रेसक्लब ता. अध्यक्ष उत्तम तांबे, माजी अध्यक्ष गौतम जाधव, निलेश म्हात्रे, खजिनदार संतोष सुतार, सचिन वनारसे आदी पत्रकार उपस्थित होते.

Popular posts from this blog