विळे धनगरवाडीला रस्ताच नाही, चार पिढ्या वहीवाट असलेल्या रस्त्याला मालकीचे कारण दाखवून जागे मालकांनी खड्डे पाडून रस्ताच केला बंद 


पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील ग्रामपंचायत विळे हद्दीतील विळे धनगरवाडीतील ग्रामस्थ गेली चार पिढ्या या धनगरवाडीत गुण्यागोविंदाने रहात आहेत. वाडीमध्ये विविध समाजाची घरे आहेत. तर पाच-सहा आदिवासी बांधवांचीही घरे आहेत. भात-शेती करणे, मोलमजुरी करणे व गाई गुरे सांभाळत दुग्ध व्यवसाय करीत गेली चार पिढ्या हे ग्रामस्थ आपली उपजीविका करीत आहेत. पाटणूस, भिरा किंवा विळे येथे आठ ते दहा कि.मी. पायी चालत जात यांच्या मुलांनी खडतर शिक्षण घेऊन आज ती नोकरी, व्यवसाय करीत आहेत. आताही जी लहान बालक शिक्षण घेत आहेत त्यांनाही शिक्षणासाठी आठ दहा कि.मी. पायी चालत शाळेत जावे लागते. धनगरवाडी पासून गावे दूर असल्याने व्यवसायानिमित्त किंवा बाजारात जाण्या-येण्यासाठी या ग्रामस्थांनी पाय वाट केली होती. याच मार्गाने त्यांच्या बैलगाड्या देखील जातात. बैलगाड्या चालवत, आई वडिलांना शेतीच्या कामात मदत करीत व शिक्षण घेत यांची मुले मोठी झाली. काही मुले शहरात गेली तर काही मुले  आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये कामाला लागले. कंपन्या वाडीपासून दूर असल्याने काही मुलांनी मोटारसायकल घेतल्या. विळे ग्रामपंचायतीने या ग्रामस्थांना वीज व्यवस्था व २४ तास पाणी व्यवस्था करून दिली. रस्ताही बनवून देण्याची तयारी ग्रामपंचायतीने करताच जागे मालकांनी हरकत घेतली. 

रस्त्याचे काम होण्यास अडचणी आल्याचे लक्ष्यात येताच ग्रामस्थांनी पायवाटेनेच येणे जाणे सुरू ठेवले. मात्र जागे मालकांना हेसुध्दा मान्य नव्हते. मग त्यांनी ग्रामस्थांच्या पाय वाटेवर अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला वाटेवर डबर टाकण्यात आली. मग ग्रामस्थांनी डबरीच्या बाजूने दुसरी पायवाट केली. त्यानंतर जागेचे मालक हट्टाला पेटले आणि मग त्यांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने खड्डे पाडून पूर्ण रस्ताच बंद केला. रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थांचे सर्व व्यवहार बंद झाले. ग्रामस्थही मग इरेला पेटले आणि मग त्यांनी सम्पूर्ण गावाचा मोडा करून खड्डे भरून घेतले. काही दिवस रस्ता सुरळीत होऊन ग्रामस्थांची ये-जा पुन्हा सुरू झाली. ग्रामस्थांना त्रासच द्यायचा असे ठरवून जागे मालकांनी पूर्वीपेक्षाही मोठे खड्डे पाडून रस्ता पुन्हा बंद केला. ग्रामस्थांनी मग ही जबादारी ग्रामपंचायत वर टाकून जंगलातून जिथून रस्ता मिळेल तिथून येणे जाणे सुरू ठेवले आहे. ज्यांच्याकडे मोटार सायकली आहेत ते ग्रामस्थ अर्ध्या रस्त्यातच गाड्या उभ्या करून पुढचा प्रवास पायी करतात. 

परंतु इथेही त्यांचे दुर्दैव आड येत आहे. कारण रस्त्यात बेवारस उभ्या राहिलेल्या गाड्यांचे टायर चोरी होऊ लागल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. देश 73 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत असताना विळे धनगर वाडीचे ग्रामस्थ मात्र रस्ता नसल्याने जंगलातून, नदी नाल्या तुन सामानाची ये जा करीत आहेत. हे आमच्या देशाचे दुर्दैव आहे. धनगरवाडीच्या ग्रामस्थांना न्याय मिळेल का? प्रतीक्षा करण्या पलीकडे त्यांच्या कडे कोणताही पर्याय उरला नाही. 

विळे  ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन मोहिते व उपसरपंच मनोहर धामुनसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदर जागे मालकास माणगाव तहसिलदार, बीडीओ, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत विळे यांच्यामार्फत वारंवार पत्रव्यवहार करून समज देण्यात आली व रस्ता खुला करण्यास सांगण्यात आले. परंतु जागेमालकाने कुणासही जुमानले नाही.

Popular posts from this blog