...आता खरंच गरजू पत्रकारांना मदतीचा हात द्या !
रोहा (समीर बामुगडे) : पत्रकार हा एक अत्यावश्यक सेवेचे भाग आहे. कोणताही प्रसंग असो, पत्रकारास सक्रिय रहावे लागते.सुगीच्या दिवसात,विशेषतः निवडणूक काळात तर पत्रकारांना पाकीट व पॅकेज देण्यात राजकारण्यांत चढाओढ लागते. पत्रकार परिषदेनंतरही आवर्जून पाकिट दिले जाते.शिवाय स्थायी समितीचे पाकिट वेगळे. सणासुदीला भेट वस्तूंची खैरात वाटली जाते.
या पाकिट पत्रकारितेचा मी नेहमीच विरोध करीत आलो.परंतू या कोरोनाच्या बिकट प्रसंगी सर्वसामान्यांप्रमाणेच पत्रकार ही अडचणीत आले आहेत. या परिस्थितीतही ते आपापल्या वृत्तसंस्थेला,चॅनलला जीवाची जोखीम घेऊन बातम्या पुरवत आहेत. पत्रकारांतही गर्भश्रीमंत, श्रीमंत, मध्यमवर्गीय व गरीब अशी विभागणी झाली आहे. काही बोलबच्चन पत्रकार व पत्रकारांचे घाऊक ठेकेदारांप्रमाणेच अनेक गरीब व गरजू पत्रकार आज सक्रिय आहेत.मोठ मोठ्या दैनिकांत stringer म्हणून काम करणारे पत्रकारही जाहिरातींवर मिळणा-या कमिशनरूपी मानधनावर जगत असतात.
आता वृत्तपत्रं बंद आहेत, जाहिरातींचा दुष्काळ आहे, मग अशा गरजू पत्रकारांनी जगायचे कसे ? आपले कुटुंब चालवायचे कसे ?
माझ्या पाहण्यात असे अनेक गरजू पत्रकार आहेत,ज्यांना आज किराणा व घरखर्चासाठी पैश्यांची गरज आहे. आणि पत्रकार म्हणून लाभलेली प्रतिष्ठा व स्वाभिमानी वृत्तीमुळे ते मदतीची याचना करू शकत नाहीत. त्यामुळे जे राजकारणी पत्रकारांचा वापर आपल्या राजकीय प्रगतीसाठी शिडी म्हणून करतात,त्यांनी अशा पत्रकारांना मदतीचा हाय द्यायला पुढे यायला हरकत नाही.
आपण या संकटकाळी आपल्या मतदार संघाची जशी काळजी घेता तशीच आपले हितचिंतक असलेल्या गरजू पत्रकारांची काळजी घेऊन त्यांना शक्य ती मदत करावी,असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांनी राजकारणी व सामाजिक संस्थांना केले आहे.