मुंबई गोवा महामार्गाला पावसाचा तडाखा; गोद नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद
नागरिकांनी दक्षता घ्यावी : रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर यांचे आवाहन
रोहा (संदीप सरफळे) :- दक्षिण रायगडमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालाही बसला आहे. माणगावजवळील गोद नदीवरील कळमजे पुल धोकादायक ठरू नये म्हणून जिल्हाधिकारी रायगड यांनी हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद केला आहे. सोमवारी आणि मंगळवारी हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. नागरिक आणि प्रवाशांनी भिरा फाट्यावरून, विळा निजामपूर मार्गे माणगाव या पर्यायी मार्गाचा वापर करावा, तसेच कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन रोह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर यांनी केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.
जगात, देशात आणि राज्यात सर्वांत रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग आहे. २०११ पासून या महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात झाली. तेव्हापासून प्रत्येक मंत्री डिसेंबर अखेरपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल, असेच आश्वासन देतात. या महामार्गावर गेल्या १८ वर्षांमध्ये १५,५६६ कोटींपेक्षा अधिक खर्च झाला असून, अजूनही बरंच काम शिल्लक आहे. गेली अठरा वर्षे झाली, तरी मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नाही. नागोठणे, कोलाड, पुई, माणगावमधील प्रमुख पुलांची कामं अर्धवट आहेत. या महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे कोकणवासीय संतप्त झाले आहेत.

Comments
Post a Comment