शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ व किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई (प्रतिनिधी) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे '22वा मुंबई लाईव्ह एंडोस्कोपी 2025 पुरस्कार सोहळा' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जीआय एंडोस्कोपीद्वारे आपल्या पोटाची काळजी घेणारे अनेक डॉक्टर्स येथे उपस्थित आहेत, त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा. देशात सर्वात पहिल्यांदा जीआय एंडोस्कोपी क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करणारे डॉ. अमित मायदेव होते. आज मात्र संपूर्ण देशभरात 7000 पेक्षा अधिक जीआय एंडोस्कोपी क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर्स आहेत. आपल्या देशाचा आकार पाहता इथे अशाप्रकारच्या डॉक्टरांची आणखी गरज आहे. एका सर्वेक्षणानुसार ज्या लोकांना पोटाच्या आरोग्याची समस्या असते त्यातील 59% लोकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या मानसिक आरोग्याचीदेखील समस्या असते. म्हणून पोटाचे आरोग्य महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात दररोज नवनवीन इनोव्हेशन्स होत आहेत. एआयमुळे आयुष्यात परिवर्तन घडत असून आरोग्य क्षेत्रावरही सर्वाधिक परिणाम होत आहे. मुंबई लाईव्ह एंडोस्कोपी 2025 यासारख्या परिषदा आपण ज्यांची सेवा करतो त्यांच्या हितासाठी व उत्तम काम करण्यासाठी एकत्रितपणे आत्मपरीक्षण करण्याची, शिकण्याची आणि विकसित होण्याची संधी देतात. या तीन दिवसीय परिषदेमध्ये इथे जी चर्चासत्रे व संवादसत्रे होतील ती नक्कीच देशवासियांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी फलदायी ठरतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मुंबई लाईव्ह एंडोस्कोपी 2025 पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या सर्व डॉक्टरांचे तसेच विजेत्यांचेही अभिनंदन केले. आजचा पुरस्कार सर्वच डॉक्टरांना, विजेत्यांना जीआय एंडोस्कोपीच्या क्षेत्रात अर्थपूर्ण योगदानासाठी प्रेरणा देईल, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आरोग्य क्षेत्रातील सेवासुविधांचे महाराष्ट्र केंद्र होत असून इथे सर्वप्रकारच्या दर्जेदार आरोग्य सेवासुविधा उपलब्ध आहेत. पण समाजातील शेवटच्या व दुर्गम भागातील माणसासाठी दर्जेदार, सुलभ व किफायतशीर आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, हे आपले ध्येय आहे. यामध्ये येथे उपस्थित डॉक्टरांची नक्कीच मदत होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये 10 वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. कारण आरोग्य क्षेत्रामध्ये डॉक्टरांची तसेच अन्य कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलसारख्या संस्था समाजातील गरिबांसाठी काम करत आहेत. यापुढेही येथील डॉक्टर्स समाजातील सर्वाधिक गरजू व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी काम करतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तरंग ग्यानचंदानी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Popular posts from this blog