पतीला अग्नी दिल्यानंतर दोन तासात पत्नीनेही जीव सोडला
अतुट प्रेमाचे नाते..!
रोहा (प्रतिनिधी) :- प्रेमात अनेकजण एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतात. पण फार कमी लोक ते शेवटपर्यंत निभावू शकतात. अशीच एक हृदयस्पर्शी घटना रोह्यातील संभे गावात समोर आली आहे. एका जोडप्याने आयुष्यभर एकमेकांना साथ दिली आणि आता सोबतच शेवटचा श्वास घेतला असल्याची घटना घडली आहे. पतीच्या मृत्यूनंतर ८ तासांत पत्नीनेही जीव सोडला. देवजी सानप व निर्मला सानप अशी पतीपत्नीची नावे आहेत.
देवजी व निर्मला या दोघांचीही प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर रोह्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्याने देवजी सानप यांना दुपारी एक वाजता देवाज्ञा झाली. सायंकाळी देवजी यांना अग्नी दिल्यानंतर अवघ्या दोन तासात निर्मला यांनीही जीव सोडला. देवजी आणि निर्मला यांच्या पश्चात मुलगी जावई व नातू असा परिवार आहे. या पतीपत्नीच्या निधनाने संपूर्ण संभे गावावर शोककळा पसरली आहे.