माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांसाठी कॉपीमुक्त अभियान
रायगड (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षांच्या पारदर्शकतेसाठी कडक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष पथके तैनात केली जाणार असून, परीक्षा केंद्रांवर कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत.
राज्यातील इ. 12 वी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 आणि इ. 10 वी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, परीक्षा केंद्रांवरील सुरळीत आणि शिस्तबद्ध व्यवस्थेसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
गैरप्रकार रोखण्यासाठी महत्त्वाचे निर्णय
गैरप्रकार झालेल्या केंद्रांवर विशेष लक्ष – मागील पाच वर्षांत (2018, 2019, 2020, 2023, 2024) गैरप्रकार आढळलेल्या परीक्षा केंद्रांवरील केंद्रसंचालक, पर्यवेक्षक आणि इतर जबाबदार व्यक्तींची नियुक्ती त्या केंद्राशी असलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांऐवजी इतर शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून केली जाणार आहे.
गैरप्रकार झाल्यास केंद्र मान्यता रद्द – फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळून येतील, त्या केंद्रांची मान्यता पुढील वर्षापासून कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना नियोजनाची मुभा – परीक्षा निकोप वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्षांना त्यांच्या जिल्ह्यात आवश्यक नियोजन करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
दक्षता पथकांची नियुक्ती – परीक्षा काळात प्रत्येक परीक्षा केंद्रावर संपूर्ण वेळ कार्यरत राहणारी दक्षता पथके तैनात राहणार आहेत. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सदस्य सचिव दक्षता समिती आणि विभागीय मंडळे यांच्याकडून या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. शिक्षण मंडळाच्या या कडक निर्णयांमुळे परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल आणि राज्यभरातील विद्यार्थ्यांना योग्य व निष्पक्ष संधी उपलब्ध होईल.