रोह्याच्या मंगलवाडी शाळेसह चार शाळांकडे पालकांची पाठ
चांगल्या शिक्षकांच्या चुकीच्या पद्धतीने बदल्या कारणीभूत
खाजगी म. सि. गांगल मराठी शाळा, पहिलीचा प्रवेश हाऊसफुल्ल
रोहा (विशेष प्रतिनिधी) :- मातृभाषेतून शिक्षण घेत मोठा यश मिळवण्याची अनेक उदाहरणे असतानाही रोहा नगरपालिकेच्या मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होण्याचे सत्र सुरूच आहे. शाळांचा दर्जा घसरत असल्याचे म्हणत पालकांनी मुलांना रोहा नगरपालिकेच्या शाळेत घालण्यास नकार देत असल्याचे समोर आले आहे. एकेकाळी मुलांच्या किलबिलाटाने गजबजलेली रोहा नगरपालिकेची मंगलवाडी, प्रफुल्ल बारटक्के शाळा (क्र. 10), तसेच नेहरूनगर शाळा आणि गोरोबा नगर शाळा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत.
लाखो रुपयांचा खर्च, आरोग्य तपासणी, प्रयोगशाळा, पौष्टिक आहार, अशा एक ना अनेक सुविधा देणाऱ्या रोहा नगर पालिकेच्या शाळांचा पट मात्र घसरण्याचे काही थांबत नाही. दरवर्षी पट वाढवा मोहिम, शालेय विद्यार्थ्यांचे थाटात स्वागत करुनही पटसंख्या मात्र खालावत चालली आहे. इंग्रजी शाळांचे गारुड सर्वत्र असले तरी खाजगी म. सि. गांगल मराठी शाळेच्या वाढलेल्या पटामुळे खाजगी मराठी शाळांची गुणवत्ता सिद्ध झाली आहे.
रोहा नगर पालिकेच्या शाळेतील पट गळती हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनला आहे. शाळा डिजीटल होत आहेत. भौतिक सुविधांचीही मोठी रेलचेल आहे. मात्र या सर्व गोष्टी पट गळती रोखण्यासाठी पुरेशा ठरत नाहीत, हे शिक्षण समितीच्या पटसंख्या पडताळणीवरुन दिसत आहे. सन २०२४-२५ या सालातील नवीन प्रवेश मंगलवाडी संकुलातील प्रफुल्ल बारटक्के शाळा पहिलीला पाच विद्यार्थी, नेहरूनगर शाळा पहिलीला दोन विद्यार्थी, गोरोबा नगर शाळा पहिलीला तीन विद्यार्थी यामुळे पट गळती झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
रोहा नगर पालिकेच्या शाळांमध्ये सर्वाधिक पटगळती ही नेहरूनगर शाळेत होत आहे. या शाळेत प्रत्यक्ष उपस्थिती सहाच विद्यार्थ्यांची असते. या पाठापोठ मंगलवाडी संकुलातील प्रफुल्ल बारटक्के शाळेचा क्रमांक आहे. मात्र मराठी माध्यमाच्या खाजगी म. सी. गांगल शाळेत 75 नवीन विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. पालकांनी रोहा नगरपालिकेच्या शाळांकडे पाठ फिरवून खाजगी शाळांना झुकते माप दिल्याचे आढळून येत आहे.
दुर्दैवाने अनेक वर्षे रोहा नगरपालिकेला पूर्णवेळ प्रशासन अधिकारी नसल्यामुळे शिक्षण समितीचा कार्यभार नीट हाताळला जात नाही. गेल्या काही वर्षात चांगल्या शिक्षकांच्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या बदल्या आणि कर्मचाऱ्यांची मनमानी नगरपालिकेच्या शाळांच्या अधोगतीस कारणीभूत ठरली आहे. प्रशासनात सुसूत्रता नसल्याने विद्यार्थ्यांचे मात्र हाल होत आहेत.
समुह शाळा निर्माण होणे... काळाची गरज
गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात शैक्षणिक सुविधा मिळाव्यात व त्यांच्यामध्ये शिक्षणातील विविध अध्ययन क्षमता विकसित होण्यास वाव मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने समूह शाळा निर्माण करण्याचे परिपत्रक काढले आहे. कमी पट असणाऱ्या शाळांच्या बाबतीत रोहा नगरपालिकेने आता कठोर पाऊल उचलणे गरजेचे मानले जात आहे.