नागोठणे स्थानकात प्रवासी ओलांडतात रेल्वे रूळ; अपघात झाल्यास जबाबदार कोण?

स्थानकाच्या शेवटच्या टोकाला एकच रेल्वे ब्रिज; नवीन ब्रिजची मागणी

नागोठणे (महेंद्र माने) :- येथील रेल्वे स्थानकात फलाट क्र. 2 व 3 कडे जाण्याकरीता स्थानकाच्या शेवटच्या टोकाला एकच ब्रिज असल्याने तेथून येणारे प्रवासी जवळचा मार्ग म्हणून रेल्वे रूळ ओलांडून येत असतात. ते येत असताना समोरून एखादी गाडी येऊन अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण ??? असा प्रश्न उपस्थित होत असून स्थानकाच्या पुढील बाजूस व मध्यभागी ब्रिज टाकण्याची मागणी प्रवासी वर्ग करीत आहे.  

नागोठणे रेल्वे स्थानक हे मध्यवर्ती व महत्वाचे ठिकाण असून या ठिकाणाहून पाली,खांब-कोलाड,शिहू-बेणसे तसेच नागोठणे शहरासह विभागातील खेडेगावातील जनता दररोज पनवेल- मुंबईकडे नोकरी,उद्योगधंदे तसेच इतर काम धंद्यासाठी प्रवास करीत असतात. यामध्ये परिसरात असलेल्या जिंदाल, सुप्रीम, रिलायन्स सारख्या मोठ-मोठ्या कंपनींच्या कामगारांचाही समावेश आहे. रेल्वेने आरामदायी तसेच कमी पैशात सुरक्षित प्रवास होत असल्यामुळे येथून रेल्वेने दररोज हजारो प्रवाशी प्रवास करीत असतात.त्यामध्ये महिला व जेष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. परंतु हे स्थानक प्रवाशांसाठी असुरक्षित असल्या कारणाने प्रवाशांना आपला जीव मुठीत घेवून नेहमीच प्रवास करावा लागत आहे. स्थानकातून मुंबईकडे जाणारी गाडी ही स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 येते. मुंबईकडून येणारी गाडी ही स्थानकाच्या पलीकडे फलाट क्रमांक 2 किवा 3 वर येते. तेथे उतरणारे प्रवाशांना स्थानकाच्या बाहेर पाडण्यासाठी स्थानकाच्या मागील बाजूला शेवटच्या टोकाला एकच ब्रिज आहे व तो खूप लांब असल्याने बहुतेक 95% प्रवाशी हे रेल्वे रूळ ओलांडून स्थानकाच्या बाहेर पडतात. हे जरी बेकायदेशीर असले तरीही एका ब्रिजवरुन सर्व प्रवाशांना सामानासहीत मागे जावून पुन्हा पुढे येणे शक्य होत नाही. कारण सकाळी 10.39 वा.ची दिवा-रोहा,सायंकाळी 07.43 वा.ची दिवा-रत्नागिरी व रात्रीची 09.00 व 09.59 ची दिवा-रोहा या गाडीमधून बरेच प्रवाशी नागोठणे येथे उतरतात. प्रवाशी रेल्वे रूळ ओलांडत असताना एखादी एक्स्प्रेस आली तर मोठा अनर्थ होऊ शकतो. सदरील वेळी अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण ??? असा प्रश्न उपस्थित होत असून रेल्वे प्रशासनाने सदरील धोका टाळण्यासाठी स्थानकाच्या पुढील बाजूस व मध्यभागी असे आणखी दोन ब्रिज टाकण्याची मागणी प्रवासी वर्ग करीत आहेत.

"या स्थानकात दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असून यामध्ये मुंबई कडून येणारे प्रवासी संख्या खूप जास्त आहे.शिवाय शहरातून आणलेले सामानही भरपूर व जड असल्याने बहुतेक प्रवासी स्थानका बाहेर पडण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून रूळ ओलांडून जात असतात. त्यातूनच मोठा अनर्थ होऊ नये यासाठी आम्ही लवकरच जनरल मॅनेजर,मध्य रेल्वे यांची भेट घेऊन नवीन ब्रिजसाठी पाठपुरावा करणार आहोत."

- ऋषिकेश भारत भोय, अध्यक्ष : नागोठणे प्रवासी संघटना

Popular posts from this blog