पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गाची पावसामुळे दुरावस्था
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडी
रोहा (प्रतिनिधी) :- मुंबई गोवा महामार्गाचे काम गेले १४ वर्षे अत्यंत मंद गतीने चालू आहे. आता पावसाने चांगलाच जोर धरला असून वाकण नाका येथे महामार्गाची पुर्णपणे दुरावस्था झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून चिखल आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यातून दूचाकी धारक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करित आहेत. या रस्त्यावर खड्ड्यात पडून दररोज अनेक अपघात होत आहेत. वाहन धारकांना तसेच नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन १४ वर्षांपासून सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाला गती द्यावी आणि या मार्गाचे कायमस्वरूपी मजबूतीकरण करावे, अशी मागणी वाहनधारक व कोकणवासीयांच्या वतीने होत आहे.
मुंबई गोवा हायवेवरील पनवेल ते इंदापूर या टप्प्यातील ठेकेदार व महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षीतपणामुळे महामार्ग बांधकाम गेल्या चौदा वर्षांपासून पूर्ण झाले नाही. सलग चौदाव्या पावसाळ्यात नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. खड्डे, चिखल आणि इथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अनेक अपघात होत आहेत. कामाची प्रगती कासवगतीने चालू असून नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.