घातक रसायन नदीत सोडणारे रॅकेट जाळ्यात
टँकर माफीयांचे महाड कनेक्शन?
रोहा (विशेष प्रतिनिधी) :- घातक रसायनयुक्त सांडपाण्याच्या टँकर कुंडलिका नदीच्या पात्रात सोडणाऱ्या रॅकेटचा गुरुवारी पहाटे स्थानिक नागरिकांनी पर्दाफाश केला. टँकरसह टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. टँकर मध्ये रोहा आणि महाड एमआयडीसीतील कारखान्यांच्या वजनकाट्याची चलनं सापडल्याने खळबळ उडाली आहे.
महाड आणि खोपोली एमआयडीसीतून रासायनिक सांडपाणी भरलेले टँकर रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या पात्रात अवैधरित्या सोडले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. प्रक्रिया न केलेले दुर्गंधीयुक्त पाणी कुंडलिका नदीच्या पात्रात सोडल्याने मासे मृत्युमुखी पडत असून दुर्गंधी येत असल्याने जनावरे सुद्धा पाणी पीत नाहीत तसेच पिके धोक्यात आली असल्याने ऐनघर, सुकेळी, हेदवली, गोफण, कुंभोशीसह नदी किनाऱ्यावरील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग कोलाड यांच्याकडे ''रासायनिक सांडपाण्यानी नदी-कालवे दूषित होत असल्याबाबत सखोल चौकशी करावी" अशी मागणी केलेली आहे.
गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास मुंबई गोवा हायवेवरील खांब गावाजवळ घातक रसायनाने भरलेला टँकर आंबा कालव्यात सोडला जात असल्याचे प्रदीप परशुराम बाईत (राहणार बाईतवाडी, तालुका रोहा) यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आणि ग्रामस्थांनी त्वरेने कोलाड पोलीस ठाण्यात खबर दिली असता पोलिसांच्या पथकाने घटनेच्या ठिकाणी छापा मारला. खबर दिलेल्या घटनेच्या ठिकाणी टँकर (एम एच 46 एफ 6199) मधून कुंडलिका नदीच्या आंबा कालव्यात रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याचे दिसून आले. कोलाड पोलीसांनी पंचनामा करून टँकर चालक महंम्मद अफसर शेख (रा. गोवंडी मुंबई), टँकर मालक आणि रोहा एमआयडीसीतील एलपी कंपनी प्रशासन यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे घातक रसायने नदीपात्रात सोडणाऱ्या रॅकेटचा मुळ सुत्रधार कोण हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
"कुंडलिका नदीत टॅंकर माफियांनी सोडलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे नदीतील मासे मृत्युमुखी पडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने नदीकिनारी पाळत ठेवली जात होती. कोलाड पोलिसांनी सदर घटनेची माहिती देताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राज कामत यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रसायनांचे नमुने घेतले आहेत. प्रयोगशाळेतून रिपोर्ट मिळताच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल."
- डॉ. राजेश औटी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ