महामार्ग कॉंक्रिटीकरणाचे काम ठप्प, सगळे मुसळ केरात!
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरणार?
रोहा : प्रतिनिधी
पनवेल ते इंदापूर महामार्गाच्या कामाला गती दिली जाईल तसेच डिसेंबर २०२३ पर्यंत महामार्गाचे काम पुर्ण करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महामार्ग पहाणी दौऱ्यावर दिले होते. ठेकेदाराकडे कॉंक्रिटीकरणासाठी महामार्गावर सद्या दोन मशीन काम करत असून काम जलद गतीने पूर्ण व्हावे म्हणून ठेकेदार आणखी काही मशीन उपलब्ध करणार असल्याचे सुद्धा रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात चव्हाणांची पाठ फिरताच ठेकेदाराने चालू असलेल्या मशीन सुद्धा उचलून नेल्या आहेत. सद्या महामार्ग रुंदीकरण आणि मजबूतीकरणाचे काम पुर्णपणे ठप्प झाले आहे. यावर्षी सुद्धा कोकणवासियांच्या हालअपेष्टा संपणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने कोकणवासीय प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.
बांधकाम मंत्र्यांच्या पोकळ आश्वासनाने पुन्हा एकदा कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम सरकारने केले आहे. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करण्याची अंतिम मुदत वारंवार देऊनही प्रत्यक्षात तो अपूर्ण असल्याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पनवेल ते इंदापूर पट्ट्यातील खड्डेमय झालेल्या महामार्गाच्या विदारक स्थितीची मुंबई खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. राज्य सरकारला येत्या गणेशोत्सवामध्ये याचा जाब द्यावा लागणार आहे. मात्र सध्या खड्ड्यातून रस्ता शोधत गाडी चालवताना वाहतूकदारांची प्रचंड दमछाक होते आहे.
आज रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा आमदार, विधान परिषदेतील तीन आमदार आणि दोन खासदार असे सर्वच लोकप्रतिनिधी महायुतीच्या सत्तेत सहभागी आहेत. रायगड जिल्हा अशी अभद्र युती पहिल्यांदाच पहात आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सत्तेत असताना सुद्धा मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था यांना दिसत नाही. या रस्त्यावर बळी गेलेल्या हजारो कोकणवासीयांचे शाप यांना लागणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीत रायगडची जनताच यांना धडा शिकवेल.
- समीर शेडगे
तालुकाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)