वडवली येथील २० वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू
वडवली/श्रीवर्धन : संतोष मांजरेकर
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीतील कुडकी धरणामध्ये वडवली गावातील एका २० वर्ष मुलाची पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.
या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून झाली आहे. मात्र हा प्रकार अपघात नसून घातपात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
रविवार दि. २१ मे रोजी मयत कु. प्रणय नाक्ती हा आपल्या चार मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी धरणावर गेला होता. पार्टी संपल्यावर दुपारी दोन च्या सुमारास हे पाचही मित्र धरणात पोहण्यास उतरले. त्यानंतर हे चार मित्र संध्याकाळी आपआपल्या घरी परतले. मात्र प्रणय घरी परतलाच नाही.
चिंताग्रस्त झालेल्या प्रणयच्या आईने त्याल शोधायला सुरुवात केली. प्रणयच्या आई ने त्या मित्रांना विचारलं असता त्यांनी गावात गेला आहे, येईल लवकरच. अशी उत्तरे दिली. पण रात्र झाली तरीही प्रणय घरी आला नव्हता.शेवटी सोमवारी सकाळी गावकऱ्यांनी सगळीकडे शोधाशोध सुरु केली. जिथे त्यांनी पार्टी केली होती. तिथे गेले असता तेथे प्रणय चे कपडे आढळून आले. तसेच तिथे पार्टी करण्याचे पुरावे सुद्धा आढळून आले.
त्यानंतर सोमवारी दिवसभर शोधा शोध घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी सात ते आठ च्या दरम्यान बॉडी वर आली. विशेष म्हणजे आपला मित्र पाण्यात बुडाला ही गोष्ट लपवून ठेवली आणि त्यातील दोघे मित्र मुंबईला सुद्धा निघून गेले. प्रणयच्या आईने त्या मित्रांना विचारले असता तो लवकरच येईल असं खोटं सांगितलं. या सर्व घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी त्या चारही मित्रांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांची कसून चौकशी करीत आहेत. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रसाद मालोजी ढेबे हे करीत आहेत.