रोहा मेमु सेवा वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासन 'मनसे' सकारात्मक, अप्पर विभागीय व्यवस्थापकांचे पदाधिकाऱ्यांना आश्वासन
रोहा : प्रतिनिधी
रोहा पनवेल मेमु सेवा वाढवत स्थानकावर मूलभूत प्रवासी सेवा द्याव्यात यासाठी रोहा शहर व तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतीच सह्यांची मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर या हजारो सह्यांसह यासंदर्भातील निवेदन मनसे व महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने बुधवार २८ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वे मुंबई विभागीय व्यवस्थापक यांना देण्यात आले. हे निवेदन त्यांच्या वतीने अप्पर विभागीय व्यवस्थापक( वाहतूक) एच. जी. तिवारी यांनी स्विकारले. यावेळी पदाधिकाऱ्यांन जवळ चर्चा करताना रोहा स्थानकातून प्रवाश्यांच्या मागणी प्रमाणे सेवा सुरु करण्यासाठी प्रशासन 'मनसे' सकारात्मक असून लवकरच कार्यवाही होईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी
दक्षिण रायगड संपर्क प्रमुख दिलीप सांगळे, जिल्हा सचिव अमोल पेणकर, शहराध्यक्ष मंगेश रावकर, उपशहराध्यक्ष अमित पवार, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ रायगड जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, दैनिक पुढारी पत्रकार महादेव सरसंबे, नितीश सकपाळ, उपाध्यक्ष पुरुषोत्तम देशमुख, रोहा रेल्वे प्रवासी संघर्ष समिती समन्वयक संकेत घोसाळकर, उपतालुकाध्यक्ष सुरज मुटके, धाटाव विभाग अध्यक्ष महेश वाडकर, रितेश किर्तने, सत्यवान निमरे आदी उपस्थित होते.
कोकणचा कॅलिफोर्निया करणार अशी आश्वासने स्वातंत्र्योत्तर सत्तेवर आलेले सत्ताधारी प्रत्येक निवडणूक प्रचारात करत होते. असे असतानाही कोकणातील पर्यटन सुखकर व जलद होण्यासाठी आवश्यक असणारी रेल्वे सेवा मात्र कोकणात यावी अशी तत्कालीन सत्ताधाऱ्यांची मानसिकता नव्हती. मात्र स्व. बॅ. नाथ पै, मधु दंडवते यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत अखेर कोकणात १९९२ मध्ये कोकण रेल्वे प्रकल्प पुर्ण करत रेल्वे सेवा आणली. याआधी मध्य रेल्वे १९८६ मध्ये रोहा मध्ये दाखल झाली असे असतानाही रायगड जिल्ह्यासह कोकणातील रेल्वे मंत्री यांसह केंद्र व राज्य सरकार मध्ये महत्वाची मंत्रीपदे लाभलेल्यांसह सर्वच खासदार, आमदार यांचे कडे विकासात्मक दुरदृष्टी नसल्याने आजही रायगड जिल्यासह कोकणी माणूस हक्काच्या रेल्वे सेवे पासून वंचित रहात आहे.
रोहा स्थानकावरील रेल्वे समस्या ह्या गेली कित्येक वर्षे जैसेथेच आहेत.कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याकडे कधी गांभीर्याने लक्ष घातले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाने रोहा मधील रेल्वे प्रवाश्यांमध्ये जनजागृती करत वाढीव रेल्वे फेऱ्या व अन्य प्रलंबित मागण्यासाठी सह्यांची मोहीम हाती घेतली. या मोहिमेत किफायतशीर अशी रेल्वे सेवा रोहा स्थानकावर उपलब्ध व्हावी यासाठी गेली अनेक वर्षे निव्वळ स्वप्न बघणारे रोहेकर हजारोंच्या संख्येने सहभागी झाले. रोहा शहरात दर दोनचार महिन्यात मोठमोठ्या इव्हेंट पहायला मिळतात मात्र उद्योग व्यवसायासाठी मात्र पनवेल, ठाणे, मुंबई व अन्य शहरांत गेल्याशिवाय पर्याय नसतो. यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अशा या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रोहा शहराच्या वतीने ही सह्यांची मोहीम घरोघरी जात यशस्वी केली.
याअंतर्गत घेतलेल्या हजारो सहयांचे निवेदन महाराष्ट्र रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सांगळे यांचे नेतृत्वाखाली मुंबई येथील मध्य रेल्वे विभागीय कार्यालयात हे निवेदन देण्यात आले.यावेळी मध्य रेल्वे चे मुख्य जनसंपर्क अधिकारी, वाणिज्य अधिकारी, याच्याही स्वतंत्र भेटी घेत रोहा स्थानकावर प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणल्या. रेल्वे सेवा वाहतुकीचे नियंत्रण करणारे अप्पर डी आर एम श्री. एच जी तिवारी यांनी रोहा मधील वाढीव रेल्वे सेवा व अन्य समस्यांवर मनसे व वाहतूक संघ पदाधिकारी यांचे बरोबर सकारात्मक चर्चा करत सर्व समस्या जाणून घेतल्या. आगामी काळात नक्कीच रोहा मध्ये वाढीव मेमू सेवा यासह अन्य समस्या मार्गी लागतील असे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.
रोहा हे मध्य रेल्वे चे महत्वाचे स्थानक असूनही आज रोहेकरांना हक्काच्या व जलद रेल्वे सेवे पासून वंचीत रहावे लागते. आज कोकण रेल्वे मार्गावर दिवसाला २२ गाड्या धावत आहेत मात्र त्यातील एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच रोहेकराना उपलब्ध होत आहेत. रेल्वे सेवा वाढली तरच रोहा शहरासह तालुक्याच्या नागरिकीकरणात पर्यायाने अर्थकारणात अमुलाग्र बदल होईल. यासाठी उद्याच्या रोह्या उज्वल विकासासाठी आवश्यक अश्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागण्या पुर्ण होइपर्यंत लढा देत राहील.
- अमोल पेणकर : जिल्हा सचिव, मनसे