सोनपावली आली गौराई
मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणपती उत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख उत्सहान पैकी एक आहे. गणपतीच्या दोन दिवसांनी जेष्ठा गौरींचेही आगमन होत प्रामुख्याने ग्रामीण भागात गौरींचा तीन दिवस उत्सव साजरा केला जातो. याला महालक्ष्मी पूजन देखील म्हटले जाते.
काही ठिकाणी पत्री स्वरूपात तर काही ठिकाणी मूर्ती स्वरूपात जेष्ठा गौरींचे पूजन केले जाते. अखंड सौभाग्यासाठी आणि सुख समृद्धी साठी जेष्ठा गौरींचा उत्सव साजरा करतात. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरींचे आगमन, दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गणपती सोबत विसर्जन केले जाते. गणरायाची जितकी भाविक आतुरतेने वाट पाहत असतात तितक्याच आतुरतेने गौरींची देखील भक्त वाट पाहत असतात.
गौराईच्या रूपात येणाऱ्या पार्वतीची आनंदाने पुजा अर्चा केली जाते. ही गौराई म्हणेज गणेशाची आई ही माहेरवाशीण असल्याने तिचे आनंदाने स्वागत केले जाते. तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला नैवेद्य दाखवला जातो. सुवासिनींसाठी गौरीचा सण खूप खास असतो. नवविवाहितेसाठी तिला पाच ओवसे द्यावे लागते, फळा फुलांनी भरलेला सुप गौराई समोर ओवासला जातो आणि आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना केली जाते ती पुढील प्रमाणे, 'आई गौरी येतच जा, तुला ओवसा देत जा, तुला सोन्या सुवर्णाचा, मला कांबी कुंबी चा ' बांबूच्या साली पासून बनवलेल्या सुप गौरी माते समोर ओवासला जातो. गौराईचा ओवसा हा सौभाग्याचा प्रतीक समजला जातो सुवासिनींसाठी ती एक पर्वणीच असते!
लक्ष्मीच्या रूपाने घरात येणाऱ्या गौराईमुळे घरात सुख समृद्धी प्राप्त होते. या दिवसाला शास्त्रात अनन्य साधारण महत्व आहे. म्हणूनच आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो.
- अरुणा कुथे (स्थानिक महिला, शिहू झोतिरपाडा)