निजामपूर विभागात विरोधकांची धावपळ नाही तर दमछाक करणार - खासदार सुनील तटकरे
पानसई येथील पक्षप्रवेश कार्यक्रमात तटकरे यांचे प्रतिपादन
साई/माणगांव : हरेश मोरे
श्रेय लाटण्यावरून एकमेकांच्या विरोधात पत्रकार परिषदा घेऊन आरोप प्रत्यारोपात सापडलेल्या निजामपूर भागातील मंजूर झालेल्या अनेक विकासकामांना अखेर मुहूर्त सापडला. कोकणचे भाग्यविधाते रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार तथा विकासकामांचा झंझावात म्हणून ओळखले जाणारे सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते 3 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि सोबत पक्ष प्रवेश असे भरगच्च कार्यक्रम झाले.
यावेळी पानसई येथे झालेल्या जलजीवन मिशन 2022 भूमिपूजन व पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, आता परिवर्तनाची लाट सुरू झाली असून बाबूशेठ खानविलकर हे पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. त्यामुळे अनेकांच्या पायाला भिंगरी लावली जात असून विरोधकांची धावपळ होणार नाही तर त्यांची दमछाक करणार आहे. पानसई गावाची कोणतीही विकास कामे शिल्लक राहणार नाहीत. बाबूशेठ खानविलकर यांना कोणताही निधी कमी पडू देणार नाही. विरोधक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत लोकांना गावागावात जाऊन भडकवत आहेत. ते तर फिरता रंगमंच आहेत. असा आमदार भरत शेठ गोगावले व प्रमोद घोसाळकर यांचा नाव न घेता तटकरे यांनी टोला लगावला. आमच्या विभागातही एक शेठ निर्माण झाला आहे हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. निजामपूर विभागातील जल जीवन योजना या आमच्याच माध्यमातून मंजूर झाल्या असून विरोधकांनी त्याचे श्रेय घेऊ नये. जेव्हा प्रत्यक्ष रणांगणाला सुरुवात होईल त्या त्यावेळी कोण? कुठे? काय काय करतो? ते सांगेन. मी आता त्याबद्दल काही बोलणार नाही. मला लोकसभा निवडणुकीत निजामपूर विभागाने मोठी ताकद दिली. तसेच पानसई गाव राष्ट्रवादीच्या प्रवाहात सहभागी झाला त्याबद्दल तुमचा विश्वास ढळू देणार नाही. गावातील प्रत्येक काम ही आता सुनील तटकरे यांची जबाबदारी आहे असे यावेळी सांगितले.
माणगाव, महाड, पोलादपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांनी सांगितले की, पानसई हे संपूर्ण गाव शिवसेनेचे होते. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना या गावात बसण्यासाठी कुठेही स्थान नव्हते. सरपंच निवडणुकीत मनसेच्या सहकार्याने सरपंच पदावर राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला आणि खऱ्या अर्थाने या ग्रामपंचायत मध्ये विकासाची गंगा सुरू झाली. त्यामुळे माझ्यावर व खासदार सुनील तटकरे यांच्यावर विश्वास ठेवून या गावातील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला याचा मला आज आनंद वाटत आहे. संपूर्ण विकास हा खासदार सुनील तटकरे यांच्यामुळेच होतो. मी फक्त एक त्यामधील दुवा आहे असे बाबूशेठ खानविलकर यांनी सांगितले. पानसई येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात महिलांचाही सहभाग मोठा होता.
जावटे येथील जल जीवन अंतर्गत मंजूर झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच भूमिपूजन, भाले नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, पानसई येथे सामाजिक सभागृहाचे उद्घाटन, नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश, शिरसाड ग्रामपंचायत अंतर्गत घोडशेतवाडी येथे जोडरस्ता, गटारलाईन कामाचे भूमिपूज व येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश कार्यक्रम, कोस्ते खुर्द येथे हनुमान मंदिर सभागृह आणि नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन, कोस्ते बुद्रुक येथे सामाजिक सभागृहाचे व नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, निजामपूर वाढीव नळ पाणीपुरवठा योजनेचे आणि तलाव सुशोभीकरणाचे भूमिपूजन, शिरवली नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, कांदळगाव खुर्द नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, बोंडशेत मानकरवाडी रस्त्याचे व नलपाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, तासगाव नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, विळे वरचीवाडी नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, विळे स्मशानभूमी कामाचे भूमिपूजन, बेडगाव नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजनाने कार्यक्रमांची सांगता झाली.
भाले येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी पाण्याच्या टाकीसाठी माधवराव रामराव खानविलकर व रमेश रामराव खानविलकर यांनी जागा उपलब्ध करून दिली.
एका दिवसात भरगच्च झालेल्या कार्यक्रमाला निजामपूर भागातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप जाधव, सरपंच राजाभाऊ रणपिसे, तुकाराम सुतार, सचिव किरण पगार, महिला आघाडी अध्यक्ष देविका पाबेकर,अनंत महाडिक, प्रसाद गुरव, मिलिंद फोंडके, सुभाष दळवी, पानसई सरपंच रुचिता धाडवे, मिलिंद खानविलकर, सयाजी मोरे, संतोष मोरे, भिकू धाडवे, काशीराम पवार, शंकर पवार, शंकर गुळंबे, शंकर शेडगे, राजाराम लांबे, पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.