पोलीस खाते नागरिकांच्या सहकार्यामुळे आहे -- पो.नि. राजन जगताप

शांतता कमिटीत केले प्रतिपादन

नागोठणे : महेंद्र माने

नागोठणे येथील बाळासाहेब ठाकरे सचिवालयातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवार 26 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव अनुषंगाने घेण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस खाते हे नागरिकांच्या सहकार्यामुळे असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी केले.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना जगताप यांनी सांगितले की, सार्वजनिक गणेशोत्सवात विद्युत रोषणाई करताना काळजी घ्या; मंडपात आपला 24 तास स्वयंसेवक ठेवा. जेणेकरून अनुचित प्रकार घडणार नाही. तसेच धार्मिक भावना दुखावतील असे देखावे तयार करू नका, आमचे कर्मचारी दर दोन/चार तासाने मंडळाला भेट देतील. गणपती विसर्जन मिरवणूक काढताना वाहतुकीस मार्ग मोकळा ठेवावा, आपल्या सणाचे पावित्र राखा; आवश्यक असणारे सर्व परवाने घ्या; दिलेल्या वेळेत कार्यक्रम संपवा. ग्रामपंचायतनेही आवश्यक ठिकाणी लाईटची व्यवस्था करावी,विसर्जन ठिकाणी स्वयंसेवक नेमावे,महावितरणाने शक्यतो लाईट जाणार नाही याची काळजी घ्यावी, लाईट जाणार असेल तर नागरिकांना अगाऊ सूचना करावी,रात्रीच्यावेळी कार्यालयात पुरेशा कर्मचारी वर्ग ठेवावा; तसेच नागरिकांनी उत्सव साजरा करताना कायद्याचा मान राखा. पोलीस हे आपल्या स्वरक्षणासाठी असून ते आपले मित्र असल्याचे सांगून पोलिस खाते हे नागरिकांच्या सहकार्यामुळे असल्याचे शेवटी जगताप यांनी सांगितले.सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी मिरवणुकीला कोणताही त्रास होऊ नये यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम चालू झाले असून ट्रीट लाईटही सुस्थितीत करण्यात येईल तसेच विसर्जन घाटावर मंडप, लाईट व ग्रां.प.कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. विलास चौलकर यांनी सार्वजनिक ठिकाणी सालाबाद प्रमाणे पोलिस कर्मचारी किवा होमगार्ड नेमण्याची विनंती केली. दिनेश घाग यांनी महावितरणाच्या कार्यालयात कायम स्वरूपी कर्मचारी ठेऊन त्यांचा मोबाइल नंबर सर्वांना देण्यात यावे;जेणे करून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. किशोर म्हात्रे यांनी हॉटेल मध्ये येणार्‍या चाकरमान्यांच्या वाहनामधील सामानाची चोरी होऊ नये म्हणून प्रत्येक मोठ्या हॉटेलमध्ये वाचमन ठेवण्याची सूचना केली. विनोद आंबाडे यांनी गर्दीच्या वेळी बाजारपेठेमध्ये मोटरसायकल उभ्या करू नये असे सांगितले. या बैठकीमध्ये सरपंच डॉ.मिलिंद धात्रक, पीएसआय सचिन निकम, पो.हवा.विनोद पाटील, ग्रा.पं.सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे व राजेश पिंपळे, माजी सरपंच विलास चौलकर, प्रकाश जैन, अनिल काळे, डॉ.अनिल गिते, किशोर म्हात्रे,लसुरेश गायकर, एकनाथ ठाकुर, कीर्तीकुमार कळस, दिनेश घाग, रूपाली गावंड, यशवंत चित्रे, विवेक सुभेकर, दिपेंद्र आवाद, असफाक पानसरे, हुसेन पठाण, किरण काळे, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांच्यासह विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते.

Popular posts from this blog