रोहा तालुक्यातील गोफण कोळीवाड्यात साजरी झाली नारळी पौर्णिमा
गोफण/रोहा : रोहित कडू
भूमिपूत्र अशी ओळख असलेल्या कोळी बांधवांचा प्रत्येक सण म्हणजे उत्साहाची पर्वणी. कोळीवाड्यात पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा साजरी झाली. इथला नजारा डोळ्यांचे पारणे फेडणाराच असतो. असाच उत्साह गोफण कोळीवाड्यात गुरुवारी नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने अनुभवायला मिळाला.
या सोहळ्यात मोठ्या संख्येने कोळी बांधव भगिनी सहभागी झाले होते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनीच पारंपरिक वेषभूषा परिधान केली होती. स्त्रीयांनी लुगडे अंगावर दागिने तर पुरूषांनी डोक्यावर टोपी अंगात टीशर्ट आणि कमरेला नक्षीदार रुमाल अशी वेषभूषा केली होती.
ढोल ताशाच्या तालावर नाचत-गात गावात फिरवण्यात आली. त्यानंतर बंदरावर जाऊन कोळी बाँधवानी ८ नारळांचे विसर्जन करण्यात आले. जूनपासून ऑगस्टपर्यंत समुद्र खवळलेला असतो. या दरम्यान माशांच्या प्रजननाचा काळही असतो. त्यामुळे मासेमारी पूर्णपणे बंद असते. नारळी पौर्णिमाच्या दिवशी सोन्याचा नारळ वाहून खवळलेल्या समुद्राला शांत केले जाते.
यावेळी मासेमारी व्यवसायात प्रगती व्हावी गावाची प्रगती व्हावी, कोळी बांधवांच्या घरात सुख-समृद्धी यावी, असे मागणे समुद्र देवाकडे मागितले जाते. नारळ वाहिल्यानंतरच मासेमारीला पुन्हा सुरूवात केली जाते.