महिलांनी साठविलेले पैसे कुटुंबाला खर्‍या अर्थाने उपयोगी - किशोर जैन

महिला बचत गट स्टॉलच्या उद्घाटन प्रसंगी केले प्रतिपादन

नागोठणे : महेंद्र माने

नागोठणे येथील शिव गणेश सभागृह येथे रायगड जिल्हा परिषदेच्या सूचनेनुसार व नागोठणे ग्राम पंचायतीच्या सहकार्याने शहरातील विविध महीला बचत गट यांनी तयार केलेल्या विविध खाद्य पदार्थ व जीवनावश्यक वस्तू यांच्या विक्रीचे स्टॉल उद्घाटन शुक्रवार 05 ऑगस्ट रोजी तहसिलदार कविता जाधव व मा.जि.प. सदस्य किशोर जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महिलांनी साठविलेले पैसे कुटुंबाला खर्‍या अर्थाने उपयोगी पडत असल्याचे किशोर जैन यांनी सांगितले.

शहरातील 15 महिला बचत गटाच्या माध्यमातून स्टॉलमध्ये खाद्य पदार्थ, शोभेच्या व जीवनाश्यक वस्तू प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आले असून शुक्रवार 05 ऑगस्ट ते मंगळवार 09 ऑगस्ट पर्यंत नागरिकांसाठी खुल्ले असलेल्या स्टॉलमधील महिलांना मार्गदर्शन करताना किशोर जैन यांनी सांगितले की, आज विविध क्षेत्रात महिला या अग्रेसर असून महिलांसाठी शासनाच्या खूप योजना आहेत परंतु महिला घरा बाहेर पडत नाहीत. सर्व कौटुंबिक महत्वाच्या गरजेच्या वेळी महिलांनी बचत केलेले पैसे कामी येत असल्याने महिलांचे उत्पन्न कुटुंबियांसाठी खर्‍या अर्थाने उपयोगी पडतात. सर्व क्षेत्रात महिलांना 50 % आरक्षण व त्याच्या मधील कलेमुळे त्यांनी मागे पडू नये,विविध व्यवसाय करा व पुढे जात रहा यासाठी शासन,बँक,ग्रामपंचायत व आमचेही सर्वांना सहकार्य आहे व पुढेही राहील.तसेच येथील महिलांना बचत गटामार्फत काही उपक्रम राबवायचे असल्यास आपल्या विभागात चारही बाजूंनी औद्योगिक क्षेत्र आहेत त्यांच्या कंपनी व्यवस्थापनेला सांगून कंपनीच्या आवारात स्टॉल लावण्याची व्यवस्था करू असे आश्वासन देऊन येथील आठवडा बाजारात सुध्दा बचत गटाच्या महिलांना विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यासाठी ग्राम पंचायत सहकार्य करून जागा उपलब्ध करून देईल असे शेवटी किशोर जैन यांनी सांगितले. यावेळी तनिष्का ग्रुपच्या अध्यक्षा शबाना मुल्ला यांच्यावतीने उपस्थितांना कापडी व कागदी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले.तसेच मान्यवरांच्या हस्ते अपंग स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.  यावेळी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक,उपसरपंच रंजना राऊत, रा.जि.बँक व्यवस्थापक प्रमोदिनी पाटील,माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, ग्रा.पं. सदस्या कल्पना टेमकर,माधवी महाडिक, दिलनवाज अधिकारी,रोझिना बागवान यांच्यासह माजी सरपंच निलोफर पानसरे, शबाना मुल्ला तसेच महिला बचत गटाच्या महिला यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता पोलसानी यांनी तर उपस्थितांचे आभार मोहन दिवकर यांनी मानले.  

महिलांनी ज्या ठिकाणी साथ दिली ते कार्य सफल झाले 

 - तहसिलदार कविता जाधव

स्वातंत्र्यापूर्वी जिजाऊंनी शिवाजी महाराज घडविले म्हणून महाराष्ट्र राज्य स्थापन करू शकलो.अशा प्रकारे स्वातंत्र्यापूर्वी  व नंतर अनेक महिलांचे सहभाग असल्यामुळे आपली उन्नत्ती व प्रगति झाली.चांगल्या गोष्टींसाठी देवाने महिलांची निर्मिती केली आहे.कोणत्याही कार्यात व कामात प्रेम व अस्था असेल तर ते खूप फुलते व त्याचा उपयोग समाज व कुटुंबाला होत असतो.महिलांनी ज्या ज्या ठिकाणी साथ दिली ते कार्य सफल झाले असून त्यांनी आपल्या कला घरा पुरत्या मर्यादित न ठेवता त्या नवीन टेक्नोलॉजीचा वापर करून समाजाला देणे गरजेचे असल्याचे सांगून स्पर्धा ही कुणाशी नसते तर ती आपण आपल्याशीच करावी असा मोल्लीक सल्ला तहसिलदार जाधव यांनी उपस्थित महिलांना दिला.

Popular posts from this blog