वारंवार बत्ती गुल; भाजपा करणार तीव्र जनआंदोलन - शहराध्यक्ष सचिन मोदी
नागोठणे ; महेंद्र माने
नागोठणे शहरात वारंवार होणारी बत्ती गुल व काही ठिकाणचे पथ दिवे लागत नसल्याने त्याची त्वरित दखल घ्यावी; अन्यथा भाजपाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन करणार असल्याचे पत्र भाजपा शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी शनिवार 06 ऑगस्ट रोजी येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता वैभव गायकवाड यांना देण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टीचे नागोठणे शहराध्यक्ष सचिन मोदी यांच्या लेटर पॅडवर नागोठणे येथील महावितरणच्या कार्यालयात सहाय्यक अभियंता वैभव गायकवाड यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेली अनेक दिवसापासून शहरातील वीज पुरवठा रात्री अपरात्री वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांना जास्त त्रास होत असतो. तसेच काही ठिकाणचे पथदिवे मेंटेनन्स न केल्याने बंद असल्यामुळे रात्री अंधारात कोणीही व्यक्ति पडून दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. तरी आपण या प्रकरणाची गांभिर्यानी दखल घ्यावी; अशी विनंती केली असून दखल न घेतल्यास नागोठणे भाजपाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेवटी पत्रात दिला आहे. यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे,तालुका सरचिटणीस आनंद लाड, शिक्षण सेल तालुका अध्यक्ष अशोक अहीरे,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष रहूफ कडवेकर यांच्यासह अपर्णा सुटे,प्रियांका पिंपळे,शीतल नांगरे,मुग्धा गडकरी, सुखदा वढावकर,गौतम जैन तसेच शहरातील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
वीज खंडित होत असताना येत असलेल्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न असून,वीज खंडित होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. तसेच पथदिवे लावण्यासाठी ग्रामपंचायतकडे आमचा एक कर्मचारी देणार असून सर्व दिवे चालू करण्याचा प्रयत्न करू.
- वैभव गायकवाड,सहाय्यक अभियंता
महावितरण, नागोठणे