खोपे येथे ग्रामपंचायतीने शेतीमध्ये विहीर खोदून पाईपलाईन टाकून केले अतिक्रमण?

मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश

रोहा : समीर बामुगडे

रोहा तालुक्यातील धोंडखार तर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीने कोणतीही परवानगी न घेता येथील राजाराम सहादेव जोशी यांच्या शेतजमीनीमध्ये बेकायदेशीररित्या विहीर खोदून, पाईपलाईल टाकून व विद्युत पोल बसवून अतिक्रमण केल्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याची तक्रार खोपे, कोकबन येथील राजाराम सहादेव जोशी यांनी वारंवार स्थानिक प्रशासनाकडे केली होती. परंतु ग्रामपंचायतीने व स्थानिक प्रशासनाने त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे आणि जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून याप्रकरणी जिल्हाधिकारी रायगड यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

रोहा तालुक्यातील खोपे येथील राजाराम सहादेव जोशी यांची संयुक्त मालकीची गट नं. ३०९ ही जमीन मिळकत असून खेळणी विकण्याच्या व्यवसायानिमित्त ते सतत बाहेर फिरत असून १५-१५ दिवस किंवा महिनोमहिने ते गावी येत नाहीत. याचाच गैरफायदा घेऊन धोंडखार तर्फे बिरवाडी या ग्रामपंचायतीने राजाराम जोशी यांच्या कुटूंबियांची कोणतीही परवानगी न घेता, अथवा पूर्वसूचना न देता शेताच्या मध्यभागावरून महावितरण कंपनीकडून विजेचे खांब बसवून त्यावरून विजवाहक तारा बसवून घेतल्या. तसेच शेतामध्ये विहीर खोदून, पाईपलाईन टाकून अतिक्रमण केलेले आहे. 

सदरचे अतीक्रमण हटवून जागा मोकळी करून देण्याबाबत राजाराम सहादेव जोशी यांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, परंतु ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष करून आपला मनमानी कारभार चालू ठेवल्याचा राजाराम सहादेव जोशी यांच्या कुटूंबियांचा आरोप आहे. याप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे आणि जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून याप्रकरणी जिल्हाधिकारी रायगड यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Popular posts from this blog