तोक्ते चक्रीवादळाचा बोर्ली पंचतन विभागाला फटका, घरांचे नुकसान!
आमदार अनिकेत तटकरे तात्काळ मदतीला
दिघी सागरी पोलीसांनी रस्ते केले मोकळे
खंडीत विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न
बोर्लीपंचतन (मुझफ्फर अलवारे) : अरबी समुद्रामध्ये घोंघावणारे तोक्ते चक्रीवादळ काल रात्री 11 पासून श्रीवर्धन तालुक्यामध्ये सुरू झाले. आधीच निसर्ग चक्रीवादळाच्या आठवणी पुसल्या गेल्या नाहीत तोच आलेल्या हे तोक्ते वादळ किती नुकसान करते यामुळे नागरिक पुरते भयभीत झाले होते. परंतु वस्तुस्थिती पहाता तोक्ते चक्रीवादळाचा वेग अंदाजे ताशी 70 किमी प्रति तास इतकी राहिल्याने ते निसर्ग चक्रीवादळाच्या तुलनेने कमी होते. शिवाय रात्री 2 नंतर वादळ थोडी आपली दिशा समुद्राकडे वळविल्याने त्यामुळे निसर्गच्या मानाने नुकसान कमी झाले. तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून तालुका प्रशासनाने समुद्रालगत असणाऱ्या व कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले होते. तोक्ते वादळाच्या तडाख्यात प्राथमिक अंदाजाने बोर्ली पंचतन विभागातील 500 घरांच्या छप्परांचे नुकसान झाले असावे. पंचनाम्याचे काम उद्यापासून हाती घेण्यात येईल, त्यावर निश्चित आकडेवारी पुढे येईल.
चक्रीवादळाची वाटचाल मुंबईकडून गुजरातच्या दिशेने असताना व श्रीवर्धन कडून पुढे सरकल्यानंतर तीव्रता सकाळी 10 नंतर थोडी कमी झाली, परंतु पुन्हा पाऊस व सोसाट्याच्या वारा सायंकाळ 5 पर्यंत चालू होता. या सर्व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी दिघी, वडवली, दिवेआगर, आदगाव ह्या भागातील नुकसान झालेल्या घरांची पहाणी करून नागरिकांना दिलासा दिला. बोर्ली पंचतन, दिवेआगर, दिघी, भरडखोल, शिस्ते, व इतर खेडेगावांना वीजपुरवठा करणाऱ्या गोंडघर सब स्टेशनला देखील तटकरे यांनी भेट देऊन आढावा घेतला. सायंकाळी 5 नंतर बोर्ली पंचतन दिवेआगर भागाचा वीजपुरवठा सुरळीत झाला होता. परंतु तो पुन्हा खंडित झाला. गोंडघर सब स्टेशन वरून वीज पुरवठा होणाऱ्या सर्व गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर महावितरण कंपनीकडून सुरू होते व लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल यासाठी प्रयत्न असल्याचे महावीतरणाकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे दिवेआगर, दांडगूरी, भरडखोल या प्रमुख श्रीवर्धन कडे जाणाऱ्या मार्गांवर झाडे पडली होती, दिघी सागरी पोलीसांच्या पथकाने तत्काळ हटविण्यात आली व मार्ग सुरू करण्यात आले.
एकंदरीत श्रीवर्धन तालुका प्रशासनाने मागील निसर्ग चक्रीवादळाच्या अनुभव गाठीशी असल्याने चक्रीवादळाच्या पूर्व तयारी मध्येच सर्व यंत्रणा सज्ज ठेवली होती व त्यामुळे श्रीवर्धनला तडाखा बसूनही तालुका प्रशासनाच्या उत्तम नियोजना मुळे सर्व तत्काळ नियंत्रणात आणण्यात मोलाचा हात उचलला.