शासनाच्या निर्देशांचे पालन करुन होलीकोत्सव साजरा करा

सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांचे आवाहन

बेर्लीपंचतन (मुज्जफर अलवारे) : आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या होळी, रंगपंचमी व शिवजयंती या सणांवर यावर्षीदेखील असणारे कोरोना महामारीचे सावट, त्याचबरोबर सणांच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये कायदा, शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संदीप पोमण यांच्याकडून शनिवार दि. २० मार्च रोजी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. संदीप पोमण यांनी सांगीतले की, मुंबईसह महाराष्ट्रभर आलेल्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपल्या व गावाच्या आरोग्याबाबत शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन व कायद्याचे भान ठेवून आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सव सामाजिक भान राखून शांततेने पार पाडा.

पोलीस व जनता यांनी समन्वयाने काम केल्यास विवीध समस्या, तक्रारी व अडीअडचणी सोडविणे सुलभ होते. तसेच कोणत्याही प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकामी सर्व घटकांतील समाजबांधवांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन श्री. पोमण यांनी केले. या बैठकीत सण-उत्सवात गावांतील विजपुरवठा सुरळीत असावा अशी मागणी करण्यात आली.

या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक श्री. कर्मराज गावडे, पोलीस नाईक संदीप चव्हाण, दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरपंच-उपसरपंच, पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, सर्वपक्षिय पुढारी, समाज अध्यक्ष आणि पत्रकार उपस्थित होते.

Popular posts from this blog