जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते नांदगाव बौद्धवाडी येथील पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन

तळा (संजय रिकामे) : महाड तालुक्यातील नांदगाव बुद्रुक-बौद्धवाडी येथील स्वदेस फाऊंडेशन आणि गाव विकास समिती नांदगाव बुद्रुक बौद्धवाडी यांच्या  सहकार्यातून राबविण्यात आलेल्या  नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन नुकतेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

ही योजना स्वदेस फाउंडेशनच्या वतीने दोन महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात आली असून यामध्ये प्रत्येक घरामध्ये नळ कनेक्शन देऊन पाणी पोहोचविण्याचे काम झाले आहे .ही योजना सौर ऊर्जेवर आधारित असून विजेची आणि आर्थिक बचत होणार आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये स्वदेस फाऊंडेशनच्या कामाबाबत स्तुती करताना स्वदेस फाउंडेशनने सात तालुक्यामधील पाणी टंचाई दूर करण्याचे व ग्राम विकासाचे केलेले काम उल्लेखनीय आहे व सौर ऊर्जेवर आधारित पाणी प्रकल्प असल्यामुळे लोकांना त्याचा खूपच फायदा होणार असल्याचे नमूद केले. गावकऱ्यांनी प्रत्येक गावामध्ये जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपल्याबरोबर गावाचाही विकास करावा, तसेच रोजगार हमी योजनेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करुन आदर्श गाव तयार झाल्यानंतर ते पाहण्यासाठी मी पुन्हा या गावाला भेट देईन, असेही सांगितले. 

यावेळी गाव विकास समितीला डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते प्रकल्प हस्तांतरित करण्याची कागदपत्रे देण्यात आली, गाव विकास समितीमधील महिलांच्या सहभागाचे डॉ.पाटील यांनी कौतुक केले. पाणी प्रकल्पासाठी स्टँडर्ड चार्टर्ड बँक यांनी आर्थिक साहाय्य केले आले, त्यांचेही यावेळी विशेष आभार मानण्यात आले. पाणी प्रकल्पामध्ये असणाऱ्या विहिरीसाठी लागणारी जागा रघुवीर देशमुख यांनी विनामोबदला दिल्याबद्दल  गावकरी तसेच शासनाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

या कार्यक्रमासाठी उप-अभियंता बांधकाम विभाग-महाड श्री.देशमुख, अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग-महाड श्री. जगदीश फुलपगारे, उप-अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग-महाड प्रशांत म्हात्रे, महाड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री.दशरथ वाघमोडे, रघुवीर देशमुख, डॉ. प्रकाश खेडेकर, स्वदेस फाऊंडेशनचे महाव्यवस्थापक तुषार इनामदार, उपसंचालक प्रदीप साठे, वरिष्ठ व्यवस्थापक अविनाश कमाने, डॉ. सचिन अहिरे, शितल सुर्यवंशी, अमित चव्हाण, शंकर जाधव, नितीन कदम, सरपंच मोहन रेशीम, ग्रामसेवक चंद्रकांत कदम, पोलीस पाटील गिरीश गायकर व ग्राम विकास समिती सदस्य व  ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अजित जाधव, प्रास्ताविक श्री. गणेश जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार सरपंच मोहन रेशीम यांनी मानले.

Popular posts from this blog