शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे इंदापूर येथील पुनित जाधव अनुकंपा तत्वावरील नोकरीपासून वंचित!
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दखल घेण्याची मागणी
इंदापूर (प्रतिनिधी) : शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे रायगड जिल्ह्यातील इंदापूर, ता. माणगांव येथील पुनित परशुराम जाधव हा आजपर्यंत अनुकंपा तत्वावरील नोकरीपासून वंचित राहिलेला आहे. याप्रकरणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
माणगांव तालुक्यातील इंदापूर येथील प्राथमिक शिक्षीका कै. पुजा परशुराम जाधव ह्या दि. १ जुलै २०१४ रोजी मयत झाल्या. त्यांचे वारस पुनित परशुराम जाधव हे डिप्लोमा उत्तीर्ण झाल्यानंतर शिवाजीराव एस. जोंधळे पॉलिटेक्नीक, आसनगांव, जि. ठाणे येथे ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग पदविका व पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे येथे ऑटोमोबाईल या शाखेत एस.वाय.बी.ए. ला शिक्षण घेत होते. त्यामुळे अनुकंपा तत्वावील नोकरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी माणगांव यांच्याकडे विलंबाने पाठविण्यात आला. त्यानंतर रा.जि.प. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी सदरचा प्रस्ताव व विलंबाचा खुलासा विभागीय आयुक्त, कोकण भवन, नवी मुंबई यांच्याकडे सादर केला. त्यानंतर आवश्यक ती कागदोपत्रांची पूर्तता देखील योग्य वेळी करण्यात आलेली आहे. तसेच वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांशी सपर्क साधूनही पुनित जाधव हे आजपर्यंत अनुकंपा तत्वावरील नोकरीपासून वंचितच राहिलेले आहेत. संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी यासंदर्भात योग्य प्रकारे दखल न घेतल्यामुळे ही समस्या निर्माण झालेली असून याप्रकरणी तातडीने चौकशीचे आदेश देऊन मला न्याय मिळवून द्यावा व तातडीने माझे नाव यादीमध्ये समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी पुनित जाधव यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.