गोष्ट एका पाणीपुरवठा योजनेच्या श्रेयवादाची

तळा (संजय रिकामे) : गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी टाहो फोडणारया तळा शहरातील जनतेला पाणी केव्हा मिळेल याची प्रतिक्षा असताना राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये कोणत्या गोष्टीवरून श्रेयवाद सुरू होईल, हे सांगता येणे खरोखरच कठीण! तळा शहरातील पाणी योजना मंजुरी प्रकरण सध्या श्रेयवादासाठी गाजत आहे. तळा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर गेल्या पाच वर्षात सपशेल अपयशी ठरलेली राजकीय मंडळी पुन्हा एकदा श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावली आहेत. 

तळा ग्रामपंचायत असताना तत्कालिन मंत्री आणि रायगडचे विद्यमान खा. सुनील तटकरे यांनी भौगोलिक परिस्थिती व तळ्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन दोन कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना म्हणजेच राष्ट्रीय पेयजल योजना दहा वर्षापुर्वी मंजुर करुन आणली. परंतु या योजनेचा लाभ जनतेला अद्यापही मिळालेला नाही. या योजनेचे काम शासनाच्या आदेशाप्रमाणे दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षीत होते. परंतु दहा वर्षे होऊनसुध्दा या कामाचे पुढे काय झाले हे कोणालाच माहीत नाही. केवळ एखाद्या पक्षाला श्रेय मिळू नये म्हणून राजकीय चढाओढीत ही योजना पूर्णपणे रखडली गेली. ना तिचे भुमीपुजन झाले ना उदघाटन! ही योजना कार्यान्वित का झाली नाही याची स्थानिक लोकप्रतिनीधींनी देखील गांर्भिर्याने दखल घेतली नाही. या योजनेचे पुढे काय झाले हे अजुन गुलदस्त्यातच आहे. जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या बाबतीत तळेवासीयांना फार कटू अनुभव असताना आता नव्याने मंजूर झालेली तब्बल नऊ कोटींची पाणी पुरवठा योजना मार्गी लागेल का असा प्रश्न तळा शहरवासियांना पडला आहे.

नुकतीच  महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत तळा पाणी पुरवठा वाढीव योजनेस तत्वतः प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. श्रेय घेण्यावरुन विविध पक्षांमध्ये राजकीय शिमगा रंगल्याने तळ्यात ‘आम्हीच केले’ फलक झळकले. सोशल मिडीयावर फोटो व्हायरल झाले तर पत्रकार परिषदा घेऊन आम्हीच योजना मंजूर करुन आणली असा दावा करण्यात आला असला तरी तळेवासियांनी जरा धीराने घेतले आहे. मागील पाणीपुरवठा योजनेचा कटू अनुभव पाहता श्रेयाच्या वादात नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने एका कामावरून रंगलेला कलगीतुरा बंद करून विकास कामे करण्यासाठी स्पर्धा लावावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. 

गेली पाच वर्ष केवळ पाणी पुरवठा योजनेसाठी एवढा अट्टाहास करण्यापेक्षा तालुक्यातील रखडलेल्या विकास कामांविषयी कोणीच बोलावयास तयार नाही. ती कामे पूर्ण करण्यासाठी स्पर्धा का लागत नाही? तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळणी, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, डंपींग ग्राउंड, लाईटची समस्या, स्थानिकांना रोजगार नसल्याने होणारे स्थलांतर, सार्वजनिक गटारे, शौचालय, शैक्षणिक सुविधा यांसह अन्य प्रलंबित कामांची मोठी जंत्री असताना केवळ एका पाणी पुरवठा योजनेसाठी  एवढा गहजब कशासाठी? पाणी पुरवठा कामास अद्याप सुरूवात देखील नाही. आता केेवळ प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या कामाचे लवकरच उद्घाटन  होणार असल्याचे सांगितले जात असले तरी कामाला सुरूवातच नसताना त्याचे उद्घाटन होईल, यावर नागरिक कसा विश्वास ठेवतील? आगामी तळा नगरपंचायत  निवडणुक नजरेसमोर ठेऊन केवळ राजकारण  असल्याचे शहरातील जनतेला वाटू लागले आहे. राजकीय पक्षांमध्ये एका कामाच्या श्रेयावरून शह-काटशहचे राजकारणात स्पर्धा असावी, परंतु ती निकोप असावी असे अनेकांना वाटू लागले आहे. आता प्रशासकीय मान्यता मिळाली पण पाणी पुरवठा योजनेच्या कामास सुरूवात किती लवकर होईल, यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याची गरज आहे.

Popular posts from this blog