चिरंजीवी संघटनेद्वारे माणगांव तहसिल कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण
साई/माणगांव (हरेश मोरे) : माणगांव तहसिल कार्यालयासमोर २२ फेब्रुवारी रोजी चिरंजीवी संघटनेद्वारे बालकांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. भारतामध्ये बालभिकारी, बालमजुरी, बालविवाहाचे वाढते प्रमाण पाहता बालकांच्या भवितव्यासाठी त्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी बालकांच्या हक्कासाठी लढणारी बालधिकारी चिरंजीवी संघटना बालभिकारी मुक्त भारताचे स्वप्न घेऊन गेली एक वर्ष गावोगावी जाऊन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत जाणीव जागृती अभियान चालवित आहेत. ही संघटना बालकांचा विकास हेच अंतिम ध्येय घेऊन लढा पुकारत आहे.
या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी तोडकरी यांचे ६० वे उपोषण असून मागील तीन वर्षापासून संघटनेचे कार्य सुरू आहे. या संघटनेच्या प्रमुख मागण्या बालमजुरी कायदयामध्ये बालकाचे वय १४ वरून १८ करण्यात यावे, बालमजुरी, बालविवाह व बालकांची तस्करी करणे हा अजामीनपात्र गुन्हा असावा, बाल न्यायालयांची संख्या वाढवून आठवड्याचे सातही दिवस चालू राहिले पाहिजे, १ आमदार १ बालगृह असे प्रमाण असावे, प्रत्येक पोलीस ठाण्याकडे त्यांच्या हद्दीतील बालभिकाऱ्यांची नोंदणी असावी, शाळेमध्ये मुलांना आठवड्याला ८ तास खेळण्यासाठी मिळायला हवे या आहेत. या लाक्षणिक उपोषणाला माणगावमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून युथ पँथरचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंदेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते विकास मोरे तसेच माणगावातील अनेक पदाधिकारी यांनी भेट दिली.

Comments
Post a Comment