महिला संघटनमध्ये परिवर्तनाची ताकद - मानसी दळवी
प्रजासत्ताक दिनानिमित्तीने आयोजित हळदीकुंकू समारंभाला महिलांचा उदंड प्रतिसाद
अलिबाग (प्रतिनिधी) : महिलांच्या संघटनात परिवर्तनाची ताकद आहे. त्यामुळे महिलांनी जास्तीत जास्त संघटीत होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेच्या गटनेत्या मानसी दळवी यांनी कुसुंबळे येथील महिला हळदीकुंकू समारंभात केले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबळे व शिवसेना कुसुंबळे विभागाच्या वतीने आयोजित हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यास महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी कुसुंबळे ग्रामपंचायत उपसरपंच रसिका केणी, सरपंच मिना लोभी, अश्विनी गाडगीळ, राधीका आपटे, पल्लवी पाटील, शिल्पा घरत, छाया पिंगळे, मनीषा पाटील, जीतिश्री पाटील, ग्रामपंचायत सदस्या आर्चना पाटील, जागृती पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील महिलांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना मानसी दळवी यांनी महिलांना सुख-दुःख वाटून घेण्याचे आवाहन केले आहे. कुसुंबळे परिसरातील महिलांनी एकजुटीचे सामर्थ्य दाखवत शेकापची अनेक वर्षाची सत्ता घालवण्यात मोठा हातभार लावलेला आहे. हे संघटन कायम ठेवून स्थानिक विकासासाठी येथील महिलांनी एकत्र यावे, असे आवाहनही मानसी दळवी यांनी उपस्थित महिलांना केले.
'तिळगुळ घ्या, गोड गोड बोला' असे म्हणत स्त्रियांनी आपल्यातले भेदभाव विसरून आपल्यातील जुनी भांडणे, रुसवे विसरून एकमेकांशी हसत-खेळत बोलावे, एकोप्याने रहावे असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजिका ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रसिका केणी यांनी केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.