समाजातील तरुणांनी उद्योगधंदे करण्यासाठी पुढे यावे - खा. सुनिल तटकरे
तळा (संजय रिकामे) : सध्याच्या युगात स्वतःमधील शक्तीस्थाने बळकट करण्याची संधी तरुण पिढीला उपलब्ध झाली आहेत. उद्योगधंदे करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे. यासाठी लागणारे सहकार्य केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतून रायगडचा खासदार म्हणून करण्यासाठी कटीबध्द असल्याचे आवाहन खासदार सुनिल तटकरे यांनी केले. रायगड जिल्ह्यातील गवळी समाज संघटना यांचे सुतारवाडी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पूर्वीपेक्षा आताची मुले भाग्यवान आहेत. विविध सुविधा आता उपलब्ध आहेत. व्यवसायाची निवड करत असताना अत्यंत जागरुक आणि डोळसपणे काम करावे लागेल व्यवसाय स्थापित झाल्यानंतर इतर वीस-पंचवीस जणांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होईल या दृष्टीने तरुणांनी विचार करण्याची गरज आहे. त्यांना नेहमीच सहकार्य केले जाईल.
महाराष्ट्रीय चॅरिटी ट्रस्ट ही आपली राज्यव्यापी संघटना आहे. प्रत्येक तालुक्यात तिचे जाळे विणलेलले आहे. चांगल्या प्रकारे तिचे काम सुरु आहे. परंतु जिल्हा पातळीवर गवळी समाज संघटना नव्हती ती आपण स्थापन करुन जिल्हातील सर्व तालुक्यातील सदस्यांना सामावून घेऊन संघटना तयार केलीत त्यासाठी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या संघटनेला माणगांव सारख्या मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मुळात ज्या संघटनेस शासकीय जागा उपलब्ध करुन द्यायची आहे ती संस्था रजिस्टर असणे गरजेचे आहे. पदाधिकारी यांनी त्यासाठी प्रयत्नशिल रहावे. माणगांव तहसीलदार यांना शासकीय जागा कुठे उपलब्ध असेल ती पाहणी करण्यासाठी मी स्वतः संपर्क करेन असे आश्वासन तटकरे यांनी दिले.
राजकारणात काम करत असताना बहुजनांना सोबत घेत प्रत्येकाच्या कर्तृत्वाच्या बळावर संधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच केला आहे त्यामुळेच गवळी समाजातील अनेक कार्यकर्त्यांना सभापती, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकपदी काम करण्याची संधी मिळाली.गवळी समाजाचा समावेश एन. टी. ब प्रवर्गात करण्यासााठी प्रयत्न करत असताना विरोधकांनी टीका केली. परंतु त्या टिकेला न जुमानता गवळी समाजाचा समावेश एन. टी. ब प्रवर्गात समावेश केला आज विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात आणि शासकीय कर्मचारी वर्गाला त्यांच्या पदोन्नतिमध्ये त्याचा लाभ होत आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बहुजनांचा आधार मिळाला म्हणुन रायगड आणि रत्नागिरी जवळ जवळ विस्ताराने तीनशे किलोमीटर असणाऱ्या मतदार संघातून लोकसभेवर निवडून दिले. या विभागाचा खासदार म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहे. जिल्हा कमिटीतील पदाधिकारी यांनी माझ्याबरोबरच पालकमंत्री अदितीताई आणि आ. अनिकेत तटकरे यांच्याकडे संपर्कात राहून आपल्या काही अडचणी असतील त्या सोडवून घ्याव्यात असे मार्गदर्शन करुन सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तिळगुळ वाटून सर्वांना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आ. अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा गवळी समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, उपाध्यक्ष खेळु वाजे, मिरगळशेठ, सुरेश तांबडे, तुकाराम खेडेकर, पदाधिकारी आणि गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.