कोलाड हायस्कूल येथे १९९७ चे माजी विद्यार्थी एकत्रिकरण कार्यक्रम उत्साहात संपन्न
विद्यार्थी एकत्रिकरणातून जुन्या आठवणींना उजाळा!
रायगड (भिवा पवार) : सुधागड एज्युकेशन सोसायटी संचलित कोलाड हायस्कूल कोलाड येथे १९९७ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांचे एकत्रिकरण करून माजी विद्यार्थी एकत्रिकरण कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य शिरीष येरुणकर यांनी भूषविले.
याप्रसंगी प्राचार्य शिरीष येरूणकर यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. जुन्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव भूगोल विषयात हातखंडा असणाऱ्या व शिस्तप्रिय असणाऱ्या प्राचार्य येरुणकर सर यांनी चक्क भूगोल विषयाचा पाठही घेतला. यावेळी आपण अजूनही शिकत आहोत याची जाणीव सर्वाना झाली. सर्वांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. जुन्या आठवणी सांगताना काहींच्या डोळ्यात पाणी तरळत होते. ज्या गुरूंच्या, गुरुजनांच्या सहवासात आपण शिक्षण घेतले त्या गुरुजनांचे व विद्यालयाचे आपण ऋणी आहोत याची सर्वांना जाणीव आहे आणि म्हणूनच या विद्यालयाच्या विकासाकरिता आपले सर्वांचे योगदान असावे असे प्रत्येकाला वाटत होते. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयास भेटवस्तू देण्यात आली. भेटवस्तू देऊन उपस्थित प्राचार्य श्री. येरूणकर, तसेच वाघमारे सर, एम. डी. देशमुख, शेख मॅडम, महामुळकर मॅडम, घोसाळकर सर, या सर्वांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य शिरीष येरूणकर सर यांनीही उपस्थित माजी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने गुणगौरव केला.
या कार्यक्रमास माजी विद्यार्थी उत्तम बाईत, अमित गुप्ता, अजित गुप्ता, परेश सारधळ, रूपम जैन, बंटी पलंगे, नरेश सानप, भागवत जांभेकर, रोहन गांधी, अभिजीत मोरे, नंदकुमार लहाने, महेश पुजारी, प्रशांत सत्वे, पत्रकार भिवा पवार, तसेच माजी विद्यार्थिनी शिल्पा गुप्ता, वैभवी पुजारी, वैशाली महाबळे, नेहा रेडीज, अश्विनी माळी, सुप्रिया लहाने, अंजली मालुसरे, साधना साटम या माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विद्यालयाचे माजी विद्यार्थी व युवकांचे प्रेरणास्थान असणारे आजी उपसरपंच व दानशूर व्यक्तिमत्व असणारे उत्तम बाईत यांनी १९९७ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी हायस्कूल या विद्यालयास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक लाख रुपये निधी मंजूर करून देण्याचे अभिवचन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित गुप्ता यांनी केले व आभार प्रदर्शन व कार्यक्रमाची सांगता रोहन गांधी यांनी केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी १९९७ दहावीच्या बॅचच्यामधील विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला