कुसूंबळे गावात '११ गाव शेतकरी संघटने'ची स्थापना 

अध्यक्ष पदावर शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांची निवड 

अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रुप-ग्रामपंचायत कुसूंबळे येथील स्वर्गीय जगन्नाथ गोपाळ केणी सभागृहात नुकतीच शेतकऱ्यांच्या उपस्थितीत '११ गाव शेतकरी संघटना' ही सर्वपक्षीय संघटना स्थापन करण्यात आली. 

या संघटनेचा मूळ उद्देश हा शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळावा व रोजगार मिळावा हा आहे. सर्वानुमते या संघटनेच्या अध्यक्षपदावर राजा केणी यांची नियुक्ती करण्यात आली. खाडीलगत असणारी कुसूंबळे ग्रुप-ग्रामपंचायत अंतर्गत येणारी ११ गावे ही प्रामुख्याने खार भागात गणली जात असून येथील शेतकऱ्यांची बरीचशी जमीन ही खारजमीन आहे. त्यामुळे खारजमीनीत अन्नधान्य कमी प्रमाणात येते. सद्यस्थितीत वाढती महागाई, वाढती मजूरी, त्यामुळे न परवडणारी शेती, त्यात कमी उत्पादन यामुळे अक्षरशः हवालदिल व हताश झालेला शेतकरी कर्जबाजारी तर आहेच, परंतु हा शेतकरी अतिशय बिकट परिस्थितीत जीवन जगत आहे. या शेतकऱ्यांची बाजू व प्रश्न निर्भिडपणे मांडता यावेत व त्यांना योग्य तो न्याय, भाव व रोजगार देता यावा या दृष्टीकोनातूनच या संघटनेची स्थापना करण्यात आली. ११ गाव शेतकरी संघटनेचे विशेष आहे की, ही संघटना सर्वपक्षीय असून कोणताही भेदभाव व पक्षपात न कराता काही नियम, तत्व व उद्देश समोर ठेऊन शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये केवळ शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल? रोजगाव व भाव कसा मिळेल? यासाठीच प्रयत्न करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजा केणी यांनी सांगितले. 

याप्रसंगी परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संघटनेच्या अध्यक्षपदावर राजा जगन्नाथ केणी, सेक्रेटरी अनिकेत विष्णू पाटील (कातळपाडा), उपाध्यक्ष मन्मय बापू पाटील (काचळी खार), उत्तम गिरीधर पाटील (चिखली खार), गजानन पाटील (पिटकीरी खार), किरण दामोदर पाटील (वाघविरा खार), निवास पाटील (खातविरा खार), खजिनदार प्रमोद पाटील (वाघविरा), तर सदस्य महेश वावेकर, श्रीकांत पाटील, रूपेश वाघ, विठोबा पाटील, प्रविण पाटील, राजेश पाटील, गणेश पाटील, निवास पाटील, सागर पाटील, रमेश पाटील, सचिन म्हात्रे, प्रदीप केणी, भूषण पाटील, संजय पाटील, दिलीप पाटील, विकास वाघ, संतोष पाटील, सत्यवान पाटील आदी मान्यवरांची निवड करण्यात आली.

Popular posts from this blog