धनगर विरोधी किल्ले रायगड विकास प्राधिकरण, दुसरा रोप-वे करण्याचा डाव असल्याने हिरकणी वाडीवरील अनेक कुटुंब होणार बेरोजगार!


रायगड (भिवा पवार/राजन पाटील) : सन १९९२ ला स्थापन झालेली रोप-वे सेवा १९९६ साली  आबालवृद्ध, शारिरीक क्षमता नसलेल्या शिवभक्तांना रायगडावर जाता येता यावे म्हणून सुरू करण्यात आली. आत्तापर्यंत या  रोप-वे ने सतत २५ वर्षे शिवभक्तांना सुरक्षित सेवा दिली आहे. रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणीवाडीला, अर्थात धनगर वाडीला या रोप-वे मुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. या वाडीवरील अनेक लोकांना रोप-वे कंपनीच्या माध्यमातून विविध पदांवर नोकरी प्राप्त झालेल्या आहेत. रोप-वे मुळे या वाडीवरील पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या रोप-वे च्या सुविधेमुळे हिरकणी वाडी, नेवाळीवाडी, खडकीवाडी, पोटले वाडी, टकमक वाडी, परडी, आमडोशी, बहुलवाडी, छत्री निजामपूर येथील अनेक लोकांना ताक विकणे, पाणी बाटली विकणे, लिंबू सरबत विकणे, हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करणे अशा प्रकारचे व्यवसाय हिरकणी वाडीवर व आजूबाजूच्या परिसरात रोप-वे च्या माध्यमातून चालत आहेत.  इथल्या लोकांनी शिवभक्तांच्या सोईसाठी स्वतः च्या हिमतीवर, तर काहींनी बँकेचे कर्ज काढून लॉजची व्यवस्था केली आहे. मात्र रायगड विकास प्राधिकरणाच्या दुसऱ्या रोपवेच्या डावामुळे हे सर्व व्यवसाय करणारे लोक बेरोजगार होऊ शकतात. मुळात इथे अास्तित्वात असलेल्या रोप-वे ने  त्याची कार्यक्षमता वाढवून वाढीव प्रवासीघेऊन जाण्यासाठीची ताकद निर्माण केली आहे. त्याप्रमाणे त्यांचे कामही प्रगत आवस्थेत आहे. शिवाय लॉकडाऊनच्या काळातही या रोप-वे व्यवस्थापनाने सर्व कामगारांना पूर्ण वेतन देऊन आपले अस्तित्व कायम राखले आहे. शिवाय दिवाळीमध्ये बोनस दिला आहे. अशा प्रकारे चांगली सेवा देणारी रोप-वे सेवा असताना पर्यायी रोप-वे चा घाट घालून, वाद निर्माण करून सुखाने जीवन जगणाऱ्या हिरकणी वाडीवर बेरोजगारी व वादाचा प्रश्न निर्माण केला आहे. 

रायगड किल्याचा सर्व्हे घेऊन योग्य जागा म्हणून गाडगेवाडी तथा हिरकणीवाडीची जागा निवडण्यात आली. सुमारे १०० उंबरठ्याची ही वाडी संपूर्ण धनगर समाजाची आहे. हा अशिक्षीत समाज अतिशय दयनीय जीवन जगत होता. तुकड्या-तुकड्यातली शेती असल्याने उत्पन्न अगदीच कमी होते. शिक्षण नाही आणि रोजगाराचे अन्य कोणतेही साधन नाही अशी बिकट अवस्था होती. अशा वेळेस या ग्रामस्थ मंडळींनी रोप वे साठी जागा उपलब्ध करून दिली. प्रारंभी २-३ वर्षे रोप वे ला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु या मंडळींनी धीर सोडला नाही. जसे पर्यटक वाढू लागले तसे हिरकणीवाडीतील अनेक तरुणांना रोप वे मध्ये नोकरी मिळाली. तर अन्य मंडळींनी वाढलेल्या पर्यटनावर आधारित व्यवसाय सुरू केले. त्यामध्ये गाईड, हाॅटेल, लाॅजिंग, पार्किंग, वस्तू विक्री अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. पाहता पाहता ५-१० वर्षांमध्ये या धनगर मंडळींची परिस्थिती बदलली. त्यातच २०१६ साली किल्ले रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना झाली. त्यातून होणाऱ्या कामांमुळे रायगडावरील पर्यटन वाढणार अशी या धनगर मंडळींची भाबडी आशा होती. परंतु आता किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी दुसऱ्या रोप वे ची घोषणा केल्याने या धनगर मंडळींचे धाबे दणाणले आहे. कारण दुसरा रोप वे वेगळ्या ठिकाणी होऊन सध्याचा रोप वे बंद पडण्याची शक्यता आहे. सध्याच्या व्यवसायांसाठी जवळजवळ सर्वांनीच कर्ज काढले आहे. आधीच कोरोनामुळे ८ महिने रोप वे बंद आहे. आता संभाजीराजेंच्या घोषणेप्रमाणे नवीन रोप वे दुसरीकडे झाला आणि सध्याचा रोप वे बंद पडला तर १०० धनगर कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संभाजीराजे छत्रपती यांना प्राधिकरणाचे अध्यक्ष केले गेले. शिवरायांनी सर्व जाती जमातींना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि कोणावरही अन्याय केला नाही. तेव्हा किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे कुठल्याही जातीवर आणि विशेषतः अशिक्षित, मागास धनगर समाजावर अन्याय करणार नाहीत अशी हिरकणीवाडीतील धनगरांची अपेक्षा होती. परंतु संभाजीराजे यांच्या दुसऱ्या रोप वे च्या घोषणेने आमच्या धनगर समाजावर मोठा अन्याय होणार आहे अशी भिती हिरकणीवाडीतील अनेकांनी व्यक्त केली आहे.

Popular posts from this blog